खड्डेमय रस्ते अपघातात दरवर्षी अनेक निष्पाप जीवांची हत्या होते. याबाबत प्रशासन कोणतीही स्पष्ट भूमिका बजावत नाही. केवळ औपचारीकतेचा भाग म्हणून कंत्राटदारावर ढोबळ कारवाई करण्याचे नाटक केले जाते. आणि पुन्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कंत्राटदार आपले काम सुरु करतो. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना वारंवार भोगावा लागत आहे. अनेकदा निर्देश देऊनही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची वाताहत होत आहे. दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने आता सरकारी प्रशासने, त्यांचे अधिकारी व कंत्राटदार यांना उत्तरदायी करावेच लागेल’, अशी कठोर भूमिका घेत उच्च न्यायालयाने सोमवारी भरपाईचा आदेश दिला.
‘खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये बहुतांश दुचाकीने प्रवास करणारे आणि मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील आहेत. अनेकदा अशा व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते असतात. त्यामुळे अशा आकस्मिक मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचे कधीही भरून न येणारे आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना मोठा भावनिक आघात असतो. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अन्वये प्रतिष्ठेने जगण्याच्या मूलभूत हक्कात सुरक्षित रस्ते व रहदारीचाही समावेश असल्याचे सर्वोच्च न्यायालयासह अनेक न्यायालयांनी स्पष्ट केलेले आहे. खराब रस्ते, उघडे मॅनहोल व खड्ड्यांच्या प्रश्नावर सन २०१८ मध्ये अनेक निर्देश देऊन जनहित याचिका निकाली काढल्यानंतर आदेशांचे पालन झाले नसल्याचे ॲड. रुजू ठक्कर व ‘न्यायमित्र’ ॲड. जमशेद मिस्त्री यांनी वारंवार न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे न्यायालयाने सुओ मोटो याचिका पुनरूज्जीवित केली. त्याविषयीच्या सुनावणीत वकिलांनी मुंबई, ठाणे व भिवंडीमधील खड्डेमृत्यू व जखमी व्यक्तींच्या घटना निदर्शनास आणल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले.मृताचे कायदेशीर वारस किंवा जखमी व्यक्तीने अर्ज दिल्यास समितीने स्वतःहून दखल घेऊन निर्णय घ्यावा. वृत्तपत्रांतील बातम्या किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून माहिती मिळाल्यास समितीने दखल घ्यावी. पोलिस ठाण्यात माहिती आल्यास समितीला ४८ तासांत माहिती देणे बंधनकारक असेल. प्रशासनाने भरपाई द्यावी आणि ती रक्कम चौकशीअंती जबाबदार अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांकडून वसूल करावी. कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकणे, दंडात्मक कारवाई व कायद्याप्रमाणे फौजदारी कारवाई करावी. कुठेही खड्डे असल्याचे कोणीही निदर्शनास आणताच संबंधित प्रशासनाला ते ४८ तासांत भरणे बंधनकारक असेल. असे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.

0 टिप्पण्या