प्रशासन महावितरणच्या खाजगीकरणाच्या घेत असलेल्या निर्णयाला तसेच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे या मागणीसाठी ठाणे काँग्रेस तर्फे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची, अदानी हटाव देश बचाव अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि अदानी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. भिवंडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंट आणि अदानी या खाजगी वीज कंपन्यां विरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे, नवी मुंबई,पनवेल आदी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आलेली आहे. हा वीज वितरणाच्या खाजगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्याने नागरिक याच्या विरोधात आहेत. या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवरती वाढीव बोजा पडू शकतो. खाजगी कंपनी या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्याने भविष्यात गरीब जनतेला याचा भुर्दंड सोसावा लागेल ,यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली.
यावेळी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशा मागण्याचे निवेदन महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम यांना देण्यात आले.याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले की वीज ही जनतेच्या हक्काची असून महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने ती लोकांच्या अधिकाराखाली येते, पण खाजगीकरणानंतर ती लोकांच्या नियंत्रणातून बाहेर जाईल. काही उद्योग समूहांना फायदा मिळावा यासाठी खाजगीकरण केले जात आहे काँग्रेसचा याला कायम विरोध राहील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.. ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी उपस्थित रहात पाठिंबा दिला.

0 टिप्पण्या