राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषासूत्री आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार असे मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे स्पष्ट केले आहे. यावर सरकारला आत्महत्या करायचीच असेल तर करा. पण, महाराष्ट्रात इयत्ता 1 लीपासून हिंदी सक्तीची करण्याचा तुम्ही फक्त प्रयत्न तर करून बघा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू, असा इशाराच राज ठाकरेंनी मिरा भाईंदर येथील सभेतून दिला. महाराष्ट्रातील शाळेत शासनाने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती केल्यावरुन मुंबईसह महाराष्ट्रात मनसैनिकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला. त्यावरुन, राज्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद हिंदी विरुद्ध मराठी असे पाहायला मिळाले. येथील मिरा भाईंदरच्या जोधपुर स्वीट आणि नमकीन दुकान मालकाला मनसे सैनिकांनी मारहाण केल्यानंतर मिरा रोडमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर, मराठी व अमराठी असे मोर्चे मिरा भाईंदरमध्ये निघाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मिरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चालाही मोठा प्रतिसाद मिळालं. त्यानंतर, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोड येथे जाऊन जाहीर सभा घेतली. सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला.
मुंबईला हात लावण्यासाठी मोठं षडयंत्र सुरु असल्याचा मोठा दावाही ठाकरे यांनी यावेळी केला. हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे मीरा भाईंदर पासून ते पालघरपर्यंतचे सर्व मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत. मी गेले 20 वर्षे ओरडून, बोंबलून बोंबलून सांगतोय की, ही नुसती माणसं येत नाहीयत तर ते मतदारसंघ बनवत आहेत. हे मतदारसंघ बनवून तुम्हाला लांब फेकून देणार आणि नंतर सांगणार आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचाच महापौर असं करुन हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा आख्खाचा आख्खा पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरु आहेत. हे आज नाही, पूर्वीपासून सुरु आहे. पूर्वी त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. पण आज लपूनछपून या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. हे काय षडयंत्र आहे ते आपण नीट ओळखा. समजून घ्या. हा सहज आलेला माज नाहीय. हे तुमच्या अंगावर येतात आणि बोलतात मराठी नाही बोलणार, हा माज तिथून आलेला आहे", असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

0 टिप्पण्या