Top Post Ad

मराठी शाळांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचा कानाडोळा

मराठी वाचली पाहिजे... मराठीत बोललं पाहिजे यासाठी सर्वत्र गदारोळ सुरु असताना मराठी शाळांकडे प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मराठी शाळा हळू हळू बंद करण्याचा घाट या सरकारने घातला असल्याचे आता लपून राहिले नाही. मात्र याकडे कोणत्याही संस्था संघटना ठोस आवाज उठवत असल्याचे दिसत नाही. मराठी शाळांच्या इमारतींकडे दुर्लक्ष करून त्यातील विद्यार्थ्यांना दुसरीकडे पाठवण्याचे कारस्थान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.  पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील घाणेघर इथे जवळपास दीडशे विद्यार्थी रोज शिक्षणासाठी  धोकादायक प्रवास करतात. लाकडी साकावावरून हे विद्यार्थी शाळेसाठी रोज जीवघेणा प्रवास करतात. मागील दहा वर्षापासून इथले गावकरी या  ठिकाणी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करीत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. गावात एसटी बस येत नसल्याने आणि इतर प्रवासाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात आड मार्गाने दररोज पायी धोकादायक शॉर्टकटचा वापर करावा लागत आहे. कारण घाणेघर ते भोपोली सात ते आठ किलोमीटर अंतर असल्यामुळे आणि बस नसल्याने विद्यार्थी हा धोका पत्करत आहेत. तरीही प्रशासन ठम्मच.   मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील टिळक मार्ग शाळेत विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केलं आहे. या शाळेची इमारत मोडकळीला आली असून, जुन्या जागेत अतिशय धोकादायक ठिकाणी साडे तीनशे विद्यार्थी शिकत आहेत. मात्र अचानक पालिका प्रशासनांने सदर जागा धोकादायक आहे सर्व विद्यार्थ्यांना दीड ते दोन किमी लांब शाळेत स्थलांतरित करणार असल्याचे पालकांना सांगितलं. या शाळेच्या बाजूलाच शाळेची नवी इमारत बांधून तयार आहे, मात्र तरिही मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवण्याचा घाट कशाला असा सवाल विचारत पालकांनी बेंच घेऊन नव्या इमारतीमध्ये प्रवेश केला. 

साताऱ्यातील जावली तालुक्यातील सायळी गावात शाळेच्या गळक्या इमारतीमुळे व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावं लागत असल्याचं समोर आलं आहे. वर्गात सगळीकडे पाणीचपाणी झाले. शाळेची इमारत एवढी जीर्ण झालीय की भिंतीना तडे गेलेत. इमारतीचे कॉलम तुटलेत त्यातून लोखंडी बार बाहेर आलेले दिसत  आहेत. शाळेच्या शिक्षकांकडून या बाबत पाठपुरावा करून देखील बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करतंय. शाळेत चार विद्यार्थी असले तरीही विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.. चंद्रपुरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना  उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सोनपूर गावातील जिल्हा परिषद शाळेला शासकीय अनास्थेचा फटका बसला आहे. 2 महिन्यांपूर्वी वादळी वा-यामुळे या शाळेचं छप्पर उडालं. त्यानंतर शाळेच्या दुरुस्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवण्यात आलं. मात्र शाळा सुरु झाली तरी शाळेची दुरुस्ती झाली नाहीये. अखेर या शाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली. ऐन पावसाळ्यात शिक्षकांना आणि मुलांना जीव मुठीत घेऊन उघड्यावरच अभ्यास करावा लागतोय. त्यामुळे आता तरी प्रशासनाने शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शाळा कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com