महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार
बाबासाहेबांचे आणि घटनाकारांचे एक स्वप्न होते, भारतात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्याचे. माझ्या २२ वर्षाच्या न्यायदानाच्या काळात बाबासाहेबांचा पाईक होऊन या कामात खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली, अशा भावस्पर्शी शब्दात बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत भारतीय राज्यघटना ही रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन असल्याचे प्रतिपादन भारतीय सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे केले. बाबासाहेबांच्या या सक्षम राज्यघटनेमुळेच देशातील कोणताही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार आणि मा.सरन्यायाधीशांचे 'भारतीय राज्यघटना' या विषयावर संबोधन कार्यक्रम मंगळवारी मुंबई विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात संपन्न झाला. दुपारी २ वाजता सरन्यायाधीशाचे विधिमंडळात आगमन झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सभागृहात लाल-पिवळ्या गोंड्याच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. महापुरुषांच्या प्रतिमांना सुदंर असे हार घालण्यात आले होते. लख्ख दिव्यांमुळे संयुक्त सभागृहात लखलखाट होता. दोन्ही सभागृहाचे आजी- माजी आमदारांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. अशा उत्साहपूर्ण वातावरणात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तेव्हा सभागृहात जोरदार टाळ्या आणि बाके वाजवून मान्यवरांनी सत्काराला प्रतिसाद दिला. तेव्हा काही सेकंदासाठी सभागृह भावुक झाले होते.
ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, फुले,शाहू,आंबेडकर आदी महापुरुषांना अभिवादन करून सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली. भारतीय राज्यघटनेचे विविध कंगोरे स्पष्ट करताना ते म्हणाले, देशात शांततेच्या आणि संक्रमणाच्या काळात ही राज्यघटना देशाला एकसंघ ठेवण्याची तरतूद घटनेत आहे. या घटनेद्वारे राज्याची जडणघडण कशी होईल, हे मार्गदर्शक सुचनांमध्ये आहे. जे राज्यकर्ते समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी कमी पडतील त्यांना पाच वर्षांनी निवडणुकीत जनतेला सामोरे जावे लागेल. अमेरिकन राज्यघटनेप्रमाणे संघराज्य आणि राज्यांना वेगळी घटना बाबासाहेबांना मान्य नव्हती. एकाच राज्यघटनेची बाबासाहेब ठाम होते. मात्र, पुढच्या पिढीचे काय प्रश्न राहतील ते आताच सांगता येणार नाही. म्हणून पुढच्या पिढीला घटनेमध्ये बद्दल करण्याची मुभा असली पाहिजे, असे बाबासाहेंबांनी सांगितले असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले. मात्र, घटनेतील ही दुरुस्ती पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहातील मताधिक्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आदी मान्यवरांची भाषणे झाली.
श्रीकांत जाधव
0 टिप्पण्या