संसद व विधिमंडळाच्या अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य यांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद मुंबई येथे पार पडली.अशा समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून पंचपक्कवान देणे म्हणजे सरकारी पैशांची केवळ उधळपट्टी चा कारभार अशी बोचरी टीका व आरोप लोकांमधून केला जात आहे. अंदाज समित्यांचे अध्यक्ष व सदस्य असे एकूण 250 विशेष पाहुणे व सरकारी अधिकारी 350 असे एकूण 600 पाहुणे या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेत हजर होते, मुंबईत झालेल्या या विशेष कार्यक्रमात संसद व विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी चांदीच्या ताटातून पंचपक्वानाचा घेतलेला आस्वाद आता चर्चेला येत आहे, एका दिवसासाठी ताटाचे भाडे 550 रुपये व भोजनाचा दर चार हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, एक खासदार व आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळाने साडेचार हजार रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळत आहे.
अंदाज समित्यांचे काम व जबाबदारी काय ?- अर्थसंकल्पातील तरतुदींची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी या समितीवर असते,मात्र, अशा समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून पंचपक्कवान देणे म्हणजे सरकारी पैशांची उधळपट्टी होताना दिसून येत आहे. पाहुण्यांना हॉटेल ताज मध्ये व अधिकाऱ्यांना ट्रायडंत अशा मुंबईतील महागड्या हॉटेलमध्ये विशेष निवासाची व्यवस्था करण्यात आली होती, राजेशाही शामियाने उभारून, लाल मखमलिचे गालीचे अंथरून पाहुण्यांचे शाही स्वागत करण्यात आले,जेवणासाठी ताटे, चमचे, वाट्या, ग्लास, चांदीचे होते,एका थाळीचा दर चार हजार रुपये,एका दिवसासाठी चांदीच्या ताटाची भाड्याची रक्कम 550 रुपये अशा तऱ्हेने या मेजवानीवर उधळपट्टी करून राज्य विधिमंडळाच्या कारभाऱ्यांचा कारभार कसा चालू आहे याचा अंदाज जनतेसमोर आला आहे ! कामकाज अंदाज समिती अर्थसंकल्पातील तरतुदी विषयी तपासणी करणे व त्या बाबतीत खर्चाचा आढावा घेऊन शासनास काटकसर,व्यवहार्य कारभाराच्या शिफारशी करणे असे काम करत असते परंतु अशा उधळपट्टीने सरकारने काय साध्य केले आहे असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे ?
राज्यात प्राथमिक शाळा बंद पडत आहेत, शिक्षक नाहीत,गणवेश वेळेवर मिळत नाहीत,प्राथमिक शाळेत आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत,चांगले टॉयलेट नाहीत,शाळा सुरू झाल्या मुलांना अजून गणवेश मिळाले नाहीत,आरोग्याचे तर अनेक प्रश्न भेडसावत आहेत, सरकारी दवाखान्यात चांगल्या सुविधा उपलब्ध नाहीत अशी सध्याची वस्तुस्थिती असतांना, आणि एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणींना हप्ता द्यायला सरकारकडे पुरेसे पैसे नाहीत दुसऱ्या खात्याचे पैसे वळवत आहेत,अशी गंभीर आर्थिक वस्तुस्थिती असताना अशा शाही मेजवानी आयोजित करून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे ?
चांदीच्या ताटातील जेवण व शाही मेनू प्रकरणी आता जोरदार चर्चा रंगत आहेत, सरकारला अशा प्रकारचं शाही भोजन देण्याचे कारण काय असे आरोप होऊ लागले आहेत. गेल्यावर्षी दादासाहेब धर्माधिकारी परिवाराचा कार्यक्रम नवी मुंबईमध्ये केला असताना मोठ मोठे राजकीय नेते उपस्थित झाले होते,त्याही वेळेस अशा चांदीच्या सोन्याच्या ताट वाट्यांचा मेजवाणीचा असाच बोलबाला झाला होता, यातून साध्य काही झाले नव्हते, मात्र या परिवारातील गोरगरीब लोकांना तेथील गैरसोयीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला होता. आपल्या मराठी संस्कृतीनुसार मराठमोळे जेवण देऊन पाहुण्यांना खूष करण्याची गरज असताना,अंगापेक्षा बोंगा दाखवून सरकारी पैसा नाहक खर्ची करणे हे व्यवहार्य आहे का ? यावर चर्चा चरवणे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निश्चितच रंगतील यात शंका नाही ?*
नारायण पांचाळ

0 टिप्पण्या