Top Post Ad

नामदेव ढसाळ यांची कविता काढा म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधात पुण्यात साहित्यिकांचे आंदोलन

चल हल्ला बोल या मराठी चित्रपटातील महाकवी नामदेव ढसाळ यांची, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो...ही कविता काढा.तसेच कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्ड विरोधातच आता चल हल्ला बोल असा थेट इशारा विविध जनसंघटना आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.  सेन्सॉर बोर्ड जाणून बुजून बहुजन संस्कृती आणि अभिव्यक्तीवर बंदी आणत असल्यामुळे सेन्सॉर बोर्ड विरोधात मोहीम सुरू केल्याचे लोकांचे दोस्त संघटनेचे रवि भिलाणे यांनी स्पष्ट केले.या मोहिमेत लोकांचे दोस्त संघटना तसेच पत्रकार संजय शिंदे,पँथर सुमेध जाधव,लोकशाहीर संभाजी भगत, कॉमेड सुबोध मोरे,संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे,दोस्त पोपट सातपुते,भानुदास धुरी आदींनी पुढाकार घेतला आहे.विविध मान्यवरांनीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून,सेन्सॉर बोर्डची गरज काय असा प्रश्न विचारला जात आहे.

   लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून लेखक,दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून चल हल्ला बोल हा सिनेमा बनवला आहे.दलित पँथर,युक्रांद या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित,आदिवासी,भटके विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका मांडणारा हा चित्रपट आहे.मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली आहे.सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सांगितले आहेत.याबाबत बोलताना महेश बनसोडे म्हणाले की,बोर्डाने नामदेव ढसाळ यांची कविता काढा असे लेखी कळवले आहे.याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला असता त्यांनी,कोण नामदेव ढसाळ ? आम्ही ओळखत नाही असा उर्मट सवाल केला.त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याच्या निषेधार्थ पुण्यातील साहित्यिक, कवी यांनी एकत्र येत अभिनव पद्धतीने गुडलक चौकातील कलाकार कट्ट्यावर आंदोलन केले. 'नामदेव तुझा बाप' असे म्हणत नामदेव ढसाळ यांच्या कविता, साहित्याचे वाचन आणि विद्रोही कवितांचे सादरीकरण करत सेन्सॉर बोर्डाच्या कोण नामदेव ढसाळ ? या प्रश्नाला उत्तर दिले.
सम्यक साहित्य संमेलन, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण होते. माजी नगरसेविका सुनीता वाडेकर, राहुल डंबाळे, नितीन चंदनशिवे, प्रा. राजा भैलूमे, डॉ. निशा भंडारे, किरण सुरवसे, सागर काकडे, हृद्यानव अशोक, रोहित पेटारे उर्फ मिर्झा, कला दिग्दर्शक संतोष सखंद, दीपक म्हस्के, कुमार आहेर, विठ्ठल गायकवाड, आनंद जाधव, आकाश सोनवणे, डॉ. शुभा लोंढे, नागेश भोसले आदी सहभागी झाले होते.

ढसाळ हे जागतिक साहित्यिक होते. ते जातीय साहित्यिक नाहीत. बहुजनांचे आग्रदुत होते ते. त्यामुळे एका साहित्यिकाला आपण विशिष्ट जातीत बंद करणे योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले. ढसाळ यांची कविता ही नुसती कविता नव्हती तर ऑन ड्युटी २४ तास असणारी व्यवस्था होती. मात्र आजच्या हेडफोन लावणाऱ्या पिढीला तो आवाजच ऐकू येत नाही, असे चंदनशिवे म्हणाले. ढसाळांच्या कवितांपेक्षा आक्षेपार्ह चित्रीकरण आजकालच्या चित्रपटात पाहायला मिळते पण ते सेन्सॉर बोर्डाला  दिसत नाही. ढसाळांनी आपल्या लेखणीतून कामगार, मजूर यांना केंद्रस्थानी ठेवून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पसरवण्याचे काम केले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. पण आज त्या सरकारलाच त्यांचा विसर पडला आहे, अशी टीका वाडेकर यांनी केली.

        

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com