Top Post Ad

बेभरवशाचे जगणे...पँथर समाधान नावकर

कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. तिसरी लाटही येणार असल्याची आणि त्यासाठी तिसरा बूस्टर डोस घेण्याची गरज असल्याची चर्चा जोरात होती. पण रुग्ण संख्या घटत चालल्याने कोरोना ओसरत चालल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे जो तो सुटकेचा नि:श्वास टाकताना दिसत आहे. पण संकट अजून टळलेले नाही आणि कोरोनाने पोबारा केलेला नाही. रिपब्लिकन चळवळीतील माझे मित्र समाधान नावकर यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनाच्या बातमीने तोच इशारा दिला आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या, गर्दीत मिसळावे लागणाऱ्या सगळ्यांच्या शिरावर त्या संकटाची, अनिश्चिततेची तलवार लटकत आहे. कसलीही शाश्वती उरलेली नाही.


 समाधान नावकर हे माजी आमदार दिवंगत टी एम कांबळे यांच्या रिपाइं ( डेमॉक्रॅटिक) या पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष होते. कांबळे यांच्या निधनानंतर त्यांनीं स्वतःचा नवा पक्ष नोंदणीकृत करून घेतला होता म्हणून ते रिपाइं (रिफॉरमिस्ट)चे पक्षाध्यक्ष बनले होते हे खरे. पण मुळात ते तळागाळातून पुढे आलेले हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याशी माझी मैत्री ते पँथरमध्ये आणि मी दलित मुक्ती सेनेत असतानापासून होती.नंतर मीही भारतीय दलित पँथरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासारखे पँथरमधील अनेक मित्रांशी जवळीक वाढली होती.

पँथर नेते टी एम कांबळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रिपाइं ( डेमोक्रॅटिक) तर्फे एक गौरव अंक ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा सु गवई यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला होता. त्या अंकाच्या संपादनाची जबाबदारी पार पाडतांना मला साहित्याच्या संकलनासाठी महिनाभर अहोरात्र धावपळ करून नावकर यांनी मोलाची साथ दिली होती.

१९७२ च्या भयंकर दुष्काळाच्या काळात ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले. त्यात अर्थातच गावात फारशी शेत जमीन हाताशी नसलेल्यांचा आणि शेतमजूर दलितांचा भरणा होता. त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रोजगार मिळेल, तिथे फुटपाथवर वा सरकारी जमिनीवर झोपड्या बांधून आपला निवारा उभारला होता. त्या काळात या झोपडीवासीयांना अभय आणि नागरी सुविधा मिळवून देण्याचा प्रश्न स्वाभाविकपणे दलित पँथरच्या अजेंड्यावर अग्रस्थानी आला होता. त्यातून प्रत्येक झोपडपट्टीत पँथरच्या छावण्या उभ्या राहत गेल्या आणि त्या चळवळीला कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मिळत गेले. समाधान नावकर हे त्यांच्यातील प्रातिनिधिक कार्यकर्ते होते.

विक्रोळी पूर्व स्टेशनलगतच्या इंदिरा नगर या झोपडपट्टीत स्थापन झालेल्या पँथरच्या छावणीतून त्यांचा आंबेडकरी चळवळीत प्रवेश झाला होता. सत्तेपासून वंचित राहिलेल्या आंबेडकरी चळवळीत   प्रशिक्षण करून आणि चरितार्थासाठी साधने पुरवून पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा प्रवेश वा पुरवठा होत नाही. चळवळीत उडी घेतल्यानंतर मागे पुढे न पाहता, नोकरी- रोजगाराची पर्वा न करता, भविष्यासाठी- कुटुंबासाठी तजवीज न करता जगण्याची लढाई लढत जे कार्यरत राहतात, तेच पूर्ण वेळ कार्यकर्ते! अशी 'वाऱ्यावरची वरात' चळवळीत झोकून दिलेल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पेलवतेच असे नाही. पण तरीही असे बेभरवशाचे जगणे स्वीकारून समाजासाठी आणि चळवळीसाठी आपल्या वकुबाप्रमाणे राबणारे शेकडो नव्हे, तर हजारो कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीत सापडतील.

त्यांच्यापैकी एक असलेल्या समाधान नावकर या कार्यकर्त्यांचा कोरोनाने आज घास घेतला.  स्वतःचा गट- संघटना चालवल्याने नावकर हे सर्वांना किमान परिचित तरी राहिले. अन त्यांच्या अकाली निधनाची  बातमी आणि हळहळ सोशल मीडियामुळे सगळ्यांना कळू शकली. पण पँथर-रिपब्लिकन चळवळीत अग्रभागी राहून नोकरी, रोजी रोटी, उदरनिर्वाहाचे साधने गमावून बसलेल्या, पण फारशी ख्याती नसलेल्या असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढे कोणत्या दिव्यांना सामोरे जावे लागते, याची वार्ता समाजात किती लोकांपर्यंत पोहोचते?

नामांतर लढ्यात सर्वस्व गमावून बसल्यानंतर आत्महत्या करून मृत्यूला कवटाळलेले नाशिकचे झुंजार नेते बाळासाहेब गांगुर्डे आज किती लोकांच्या आठवणीत आहेत? तब्बल १६ वर्षे चाललेल्या त्या लढ्यात लाठीमारात अपंगत्व आलेले आणि नोकरी गमावलेले भांडुपचे नेते आर के तायडे यांचे पुढे काय झाले, हे कुणाला ठाऊक आहे?

  • दिवाकर शेजवळ 
  • divakarshejwal1@gmail.com
--------------------------------------------

बेभरवशाचे जगणे पँथर समाधान नावकर यांचे दुःखद निधन धक्कादायक वाटले, आयु दिवाकर शेजवळ यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांची व्यथा खूप मार्मिकपणे मांडली, जे कार्यकर्ते कामधंदा सोडून नोकरीच्या बंधनात न राहता चळवळीत किर्याशील राहतात त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट असते,ते समाजासाठी,चळवळीसाठी कितीही प्रामाणिकपणे काम करीत असले तरी समाज त्यांची योग्य दखल घेत नाहीत, दलित मुक्ती सेना, मध्ये मी कार्यशील असतांना नाका कामगार होतो, मीच काय, खूप कार्यकर्ते होते, हिरामण कदम, रमेश इंगळे, चिंतामण मोरे, गोटीराम तायडे, सदाशिव दाभाडे हे शेवट पर्यंत कसे जगले कोणी नाही पाहिले, गोटीराम तायडे औरंगाबादला लाटी हल्ल्यात वाचले, पण आर के तायडे यांच्या किती बरगड्या तुटल्या हाता,पायाची काय स्थिती होती यांची कोणी कोणी दखल घेतली हा इतिहास खूप वेदनादायक आहे,असो कार्यकर्त्यांनी प्रथम कामधंदा किंवा नोकरी करून घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी नंतरच चळवळीत किर्याशील राहावे, नोकरी, कामधंदा करून ही चळवळीत किर्याशील राहता येते, यांचे उत्तम उदाहरण मीच आहे 1982 पासून नाका कामगारांना संघटित करून न्याय हक्क प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काम करीत होतो, आणि आज टाटा पॉवर कंपनीत वयाची साठ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे,तरी नाका कामगार, घर कामगार यांच्याशी असलेलं नाते तुटले नाही, फक्त परिस्थितीचे भान ठेवून काम करणे आवश्यक असते, आयु दिवाकर शेजवळ नेहमीच समाधान नावकर सारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांची नेत्यांची दखल घेऊन त्याबद्दल सडेतोडपणे लिहतात त्यांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन, समाधान नावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- सागर तायडे (मुंबई)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com