Top Post Ad

चंद्रभागेच्या तीरी... उभा मंदिरी... तो पहा विटेवरी....


वास्तविक पाहता पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ, विठाई इत्यादि नांव असणारा हा पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का? कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात उल्लेख नाही. स्मृती - श्रृती, वेद पुराण, - उपनिषद - अरण्यक- मनूस्मृती या तमाम ब्राम्हणी वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही तसेच विठ्ठल हे नांव रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही. विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही म्हणजे वैदिक धर्माचे स्वरूप जानणाऱ्या वेदांच्या सर्वश्रेष्ठ ब्राम्हणी ग्रंथात जर विठ्ठलाचे कोठे ही नांव नाही. तर ह्या सर्व पुराव्या वरुन हेच सिद्ध होते की पंढरपूरचा विठ्ठल हा देव नसून तो एक महामानव आहे

विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतात कि, विठ्ठलाचे डोळे, त्याचे खांद्यावर रुळणारे लांब कान आणि कपाळ विशाल आहे. इतर वैदिक देव-देवता सारखे विठ्ठलाने हातात कोणतेही हिंसा करनारे शस्त्रे नाहीत, आयुधे धरलेले नाही की कोणतेही हत्यार नाही, विठ्ठलाला चार हात नाहीत, तो आपले दोन कमलहस्त आपल्या कमरेवर ठेऊन उभा आहे तसे करून जणू तो जगाला आपल्या लेकरांना, उपासकांना म्हणजेच वारकऱ्यांना अहिंसेचा संदेश देत आहे अर्थात पंढरपूरचा विठ्ठल हा अहिंसेचा पुरस्कर्ता महामानव आहे देव नाही तसेच समतेने- ममतेने, बंधूभावाने, प्रेमाने, आपुलकीने वागवणारा असा पंढरीच्या विठ्ठला मध्ये कुठलाच भेदभाव नाही, उच्चनिचता नाही, गैरबराबरी नाही

विठ्ठलाला होमहवन- अभिषेक करण्याची गरज लागत नाही, त्याला दक्षिणा वाहण्याची गरज नाही, त्याला भट-ब्राह्मणाची मध्येस्थही लागत नाही आणि त्याच्या पूजेसाठी मंत्र- तंत्र म्हणण्याची सुद्दा गरज नाही. फक्त मुखाने नामाचा गजर केला तरी चालतो. तो प्रसन्न हसतो आहे. विठ्ठलाची अहिंसक शांत मूर्तीच तो कोणी तरी महामानव असण्याचे प्रतिक आहे. अर्थात पंढरपूरचा विठ्ठल देव नाही- 

संत नामदेव महाराज
वारकरी संप्रदायाचे संस्थापक मानले जातात ते आपल्या वारकरी संत सहकार्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची ओळख करून देताना सांगतात.....
"बौद्ध अवतारी आम्ही झालो संत |, वर्णावया मात नामा म्हणे ||"
तुझा बुद्धावतार वर्णन करण्यासाठी म्हणजे बुद्धविचार लोकांना सांगण्यासाठी आणि बौद्धावतारात तु कशी वैदिकांवर मात केली होती ते वर्णन करण्यासाठी आम्ही संत झालो आहोत, अशा शब्दात नामदेव महाराज अवतारकार्य सांगतात
पुढे जाऊन संत नामदेव महाराज विठ्ठला हा तथागत बुद्धच आहे असे आपल्या अभंगात सांगतात•••
गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू | आपण योगेश्वरु बौद्ध रुपी ||
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार | झाला दिगंबर अवनिये |
ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी || "धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |
या लागी बौद्ध रूपे पंढरी नांदसी ||"

संत तुकाराम महाराज
बौध्यअवतार माझिया अदृष्टा ।मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।१।।
आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ।।२।।
म्यांच तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका म्हणे ।।३।।   (अंभग2560)

मौन धारण केलेला हा बौद्धअवतार माझ्या वाट्याला आला आहे. लोकांसाठी शाम चतुर्भुज झाला आहे. संतांशी गुजगोष्टी करत आहे. माझ्या भाग्यात हे कलियुग आलं आहे, तुझं रुप डोळ्यापुढून हाकललं तरी जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "मीच तुझं असं काय घोडं मारलं आहे की तुला माझी कींव येत नाही?"

संत तुकाराम महाराज म्हणतात बुद्ध अवतार मी पाहिलेला नाही. मुखाने मौन धरण्याची निष्ठा तू धारण केली पण प्रत्यक्षात आपल्याला बुद्ध पाहता आलेला नाही ही एक प्रकारची खंत व्यत्क केलेली आहे.

 बुद्ध सतत भ्रमण करत. नीती-अनिती, धर्म, समजून सांगत. लोकांना उपदेश करत. पण विठ्ठलाने मात्र मौन धारण केलं आहे. दोन्ही हात कटीवर ठेऊन तो उभा आहे. त्याचं मौन हे सामान्य लोकांसाठी आहे, मात्र तो संतांशी गुजगोष्टी करतो असं तुकाराम महाराज सांगतात
"लोकांचियेसाठी शाम चतुर्भुज | संतांसवें गुज बोलतसां ||
चतुर्भुज होणं म्हणजे बंधनात बांधलं जाणं. सामान्य लोकांसाठी विठ्ठल बंधनात बांधलेला आहे, पण संतांशी मात्र तो गुजगोष्टी करतो

संत एकनाथ महाराज
बुद्धाला बोधाई माऊली म्हटलं आहे.
बोधोनि सकळही लोका | बोधे नेले त्रिविध तापवो ||
बौद्धरुपें नांदसी | बोलेविना बोलणे एक वो || साधक बाधक जेथे एकपणेच बोधविसी वो |
ऊदो म्हणो ऊदो बोधाई माऊली हो ||

किंवा
"लोक देखोनि उन्मत्त | दारांनी आसक्त || न बोले बौद्धरुप | ठेविले जघनी हात ||"
"धर्म लोपला अधर्म जाहला |हे तु न पाहसी || या लागे बौद्धरुपें पंढरी नांदसी ||

संत जनाबाई
होऊनिया कृष्ण कंस वधियेला |आता बुद्ध झाला सखा माझा ||
लोक देखोनी उन्मत | दारांनी आसक्त, न बोले बौद्धरुप, ठेविले जघनी हात ||

संत बहिणाबाई
कलियुग हरी । बुद्ध रुप धरी । तुकोबा शरीरी प्रवेशला ।।
संत तुकारामाच्या तोंडून साक्षात तथागत बुद्धच बोलत आहेत, असे संत बहिणाबाई सूचित करतात

तसेच,....संत संप्रदाय *बुध्दालाच विठ्ठल मानताना म्हणतात -
संत तया दारी, तिष्ठताती निरंतरी | पुंडलिकासाठी उभा ।
धन्य धन्य विठ्ठल शोभा || बौध्द अवतार घेऊन विटे समचरण ठेऊन |
लोक देखोनि उन्मत्त दारांनी आसक्ता | न बोले बौध्द रूप ठेवीले जघनी हात ||

भक्तीविजय 
कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रूपी, बौध्दरूपे असता श्रीपती |
जनांसी दाखवूनी नाना प्रचिती, वाढविली कीर्ती संताची ||

संतविजय अध्दाय 10 महिपतीबुवा ताहाराबादकर(कांबळे)
कलियुगामाजे साचार | असत्य भाषण झाले फार
यास्तव बौध्द अवतार | देवे सत्वर घेतला॥

स्वानुभव दिनकर 
कळिचा प्रातुर्भव देखोनी, बुध्दियोगे आवडे उगेपणी | बौध्दावताराचिया आयणी ||

संत चोखोबा
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ।।१।।
मी यातिहीन महार । पूर्वी निळाचा अवतार ।।२।।
कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्मप्राप्ती ।।३।।
चोखा म्हणे विटाळ । आम्हा पूर्वीचे हे फळ ।।४।।  (कदम ग्रंथ अभंग:पृ.11)

चोखोबा  "निळाचा अवतार" म्हणजे मूळ "नागवंश" होय. ( तथागत बुद्ध नागवंशिय होते.
कृष्णाचा अंत नागवंशीयाकडून झाला. हीच कृष्णनिंदा झाली आणि म्हणून "महार" जन्म झाला असे चोखोबा या अभंगातून सांगतात

चोखोबा "महार" अर्थात् अस्पृश्य जातीचे असुनही त्यांचे संपुर्ण कुटुम्ब वारीकरी संप्रदायाचे निष्ठावान वारिकरी बनुनी अमानवतावादि वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करित होते

संत चोखोबा म्हणतात.....
कली माजी देव बुद्ध रुप जाला | शरण शरणवाणी शरण तिवाचा विणवणी ||
कली युगातिल बुद्ध आमचे दैवात आहे. त्याला त्रिवार शरण जातो

संत चोखोबाची पत्नी संत सोयाराबाई 

देहासी विटाळ म्हणती सकल | आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध
देहीचा विटाळ देहिच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म || 

संत चोखोबाचा मुलगा संत कर्म मेळा

आमुची केली हीन याती | तुज का न कळे श्रीपती
जन्म गेला उष्टे खाता  लाज न ये तुमचे चित्ता ||

संत चोखोबाचा मेव्हणा संत बंका महार आणि मुलगी संत निर्मला

हाती न घेता तलवार बुद्ध राज करी जगावर |  ऐकोनी "बंका" करित उत्तर, बुद्ध अवतार पांडुरंग ||

सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता नष्ट करण्याची भुमिका संत चोखोबा व त्यांच्या कुटुंबियांनी घेतली खरी, पण शेवटी ते आपल्या नशिबाला किंवा प्रारब्धाला शरण का गेले? कारण या काळात आपेगाव पैठणच्या ज्ञानेश्वरांच्या ज्ज्ञानेश्वरीच "कर्ममार्ग" तत्वज्ञानाचा समाज जीवनात मोठा प्रभाव होता

आपेगावच्या ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरीतील ही ओवी•••••••

कर्म पराधिनपणे | निपजते प्रकृतिपूर्ण
म्हणून संग जंव प्रकृतीचा | तंव त्याग त घड़े कर्माचा (ज्ञा.३:६ ३)
कर्म अर्थात नशीब प्रकृतितुन म्हणजे पुनर्जन्मातुन निपजते, तेव्हा माणूस कर्माच्या बंधनातुन मुक्त नाही

संत चोखोबांचे अख्ख कुटूंब विठ्ठलमय अर्थात् बौद्धमय झालेले पाहुन वैदिक ब्राह्मणाने संत चोखोबाची भिंती खाली चिरडुन हत्या केली  वैदिक ब्राह्मणाचा ऐवढा दहशतवाद की संत चोखोबाचे प्रेत भिंती खालुन काढण्याची कोणाचिही हिम्मत नव्हती "वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेने संत चोखाबाची केलेली हत्या, संत कबीर व संत रोहिदासा नंतरची तिसरी हत्या आणि महाराष्ट्रात झालेली संताची पहली हत्या होती.

परंतु एक लक्षात असू द्या.........

मरण आहे या सकळा | भेणे अवकळा अभयमोल ||

मरणाच्या भिती पेक्षा मरणाची प्रतिष्ठा महत्वाची असते. जेव्हा संत चोखोबाच्या हत्या झाली तेंव्हा संत नामदेव उत्तरेत होते. संत नामदेवानी चोखोबाची हाडं एकत्र करून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर चोखोबाची समाधी केली. अस्पृश्य जातीचे संत चोखोबा महार विठ्ठलाच्या पहिल्या पायरीचे तमाम संताचे प्रेरणा स्थान झाले.

संत मनोभावे म्हणू लागले•••
कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रुपी ।  बौद्धरुपी असता श्रीपती ।।
जनांसी दाखवूनी नाना प्रचिती । वाढविली किर्ती संताची ।।
या सर्वांवरुन विठ्ठल हा बुद्धच आहे असं संत परोपरीने सांगताना दिसतात.......

पंढरपूरचा विठ्ठल हा तथागत बुद्ध आहे हे झालं संतांची गाथेतिल अभंगवाणीचे पुरावे. आता आपण तथागत बुद्ध हा विठ्ठल आहे त्याचे प्रत्यक्ष पुरावे पाहुया......

महाराष्ट्रात शीळाप्रेसवर पंचाग नवग्र जात असे, या पंचागाच्या मुखपृष्ठावर नवग्रह व दश अअवताराच्य चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र छापत व त्या विठ्ठलाच्या खाली बुद् असे लिहिलेले असे......
विचारवंत डॉ. रा.चि.ढेरे दोन पुस्तकांचा ऊल्लेख करतात पहले पुस्तक श्रीविठ्ठल एक महासमन्वय आणि दुसरे म्हणजे श्रीराम सहश्त्रनाम ह्या स्तोत्राच्या पुस्तकात गरुड, हनूमान विठ्ठलाचे चित्र छापलेले असून त्याच्या खाली बुद्ध असे लिहिले आहे
तसेच महाराष्ट्रात दोन मंदिर आहेत
महाराष्ट्र - तासगांव - सांगली विंचूरकरांनी बांधलेले दक्षिणी शैलीचे गणेश मंदिराच्या गोपूरावर बुद्धाची मूर्ति आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या ओवारित  बुद्ध मूर्ती दगडावर कोरलेल्या आहेत. संत नामदेव महाराजा पासून ते संत तुकाराम महाराजा पर्यंतच्या संताच्या वाणीतून आणि महाराष्ट्रातील लिखीत व कोरीव शिल्पातिल पुराव्यावरून सिद्ध होतं की पंढरपूरचा विठ्ठल तथागत बुद्धच आहेत. आज जरी इतिहासतज्ञ, वैचारिक अभ्यासकांना संत आणि बुद्ध यांच्यातलं विचारधारेचं नातं माहिती असलं तरी सामान्य वारकरी म्हणवणाऱ्यांना हभप किर्तनकाराला बुद्धांविषयी प्रेम वाटत नाही.आपुलकी वाटत नाही. आदर वाटत नाही कारण वैदिकब्राह्मणी मनुवाद्यानी त्यांच्या मनात असं भरवलं आहे की बुद्ध आपला नाही, तो परका आहे, आपला बुद्धाशी काही संबंध नाही

 स्वतःला विठठलाचा वारकरी म्हणवणाऱ्या हभप किर्तनकाराच्या डोक्यात जातीयवादी, विषमतावादी, माणसामाणसात भेद करणाऱ्या वैदिकब्राह्मणी विचारांचीच पेरणी झालेली असल्यामुळे, त्यांच्या मनात जातीयवादी विचारांचं तण माजलेलं आहे.  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारल्यामुळे तर या अल्पबुद्धि लोकांच्या मनात बौद्ध धम्म आणि तथागत बुद्ध यांच्याविषयी अधिकच दुरावा निर्माण झाला आहे कारण वैदिक ब्राह्मणांनी त्याला खतपाणी घातले आहे.

अशा परिस्थितीत या मूढ लोकांना आपल्या मूळ विचारांचं, धर्माचं भान आणून देण्यासाठी संत नामदेवा पासून ते संत तुकाराम महाराजांचा हे अभंग अतिशय महत्त्वाचा आहे.  आपली परंपरा स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणारी परंपरा आहे. लोकांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक गुलाम बनवणारी, उच्चनीचता पाळणारी, भेद पाळणारी, द्वेष पसरवणारी परंपरा आपली नाहीच ति वैदिक ब्राह्मणी मनुवादि परंपरा आहे तेव्हा......

( संदर्भ: - उल्हास पाटील, गाथा परिवार)


गैरसमज दूर करा --------------

"तथागत भगवान बुद्ध" हे केवळ 1956 ला धर्मांतरीत झालेल्याच लोकांचीच "विरासत" नाही तर तथागत भगवान बुद्धांचे तुम्ही-आम्ही तमाम बहुजन समाज "वारसदार" आहात तुमच्या वारसाहक्काचे पुरावे यथा योग्य पध्दतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आशा आहे आणि विश्वास देखील आहे की ज्या दिवशी बहुजन समाजाला इतिहासिक सत्यतेचे जेव्हा भान येईल तेंव्हा संतविचारांच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धाचे विचार बहुजनां मध्ये रुजण्याला अनुकूल मनोभूमी तयार होईल. यासाठी वैचारिक मशागत करावी लागेल आणि ते केले तरच भविष्यात "बहुजनांचा बहुजनसमाज" निर्माण होऊ शकतो..... जे मिटवता आले नाही ते परिवर्तीत करण्यात आले. इतिहास दडपण्यासाठीचे हे शडीयंत्र आहे. तथागतांना आवतारात गुंफने हे काही प्रमानात फक्त भारतातच घडवले गेले आहे. ईतर देश हे मानत नाहीत. कोणावरही विश्वास न ठेवता कोणत्याही गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर पारखून बघावे ही बुद्धांचीच देसना होती. या देसने मागचे कारण कदाचीत तथागतांना हे माहीत होते की धम्माचा गैरअर्थ लावला जाऊ शकतो. सत्य आणि असत्य जाणून घेण्याची ही वेळ आहे. बुद्ध हे इतिहास पुरुष आहेत. देवआवतार नाहीत ..


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. बौद्ध अवतार माझिया म्हणजे बौद्ध अवतार सुद्धा माझंच असे म्हणतात अदृष्टा म्हणजे नशिब.. अदृष्टा । मौनी मुखी निष्ठा धरियेली नशिबात शांत, निष्ठा धरण्याची अवतार आला आहे...

    उत्तर द्याहटवा

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com