१९९५. महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचं सरकार स्थापन झालेलं. मंत्री मंडळासमोर एक प्रेझेंटेशन सादर होतं. मुंबईला पडणारा अनधिकृत झोपड्यांचा विळखा आणि त्यात होणारं मुंबईच्या तिवरांच्या झाडीवर, नाल्यांवर, मिठी नदीवर होणारं आक्रमण, त्याचे दुष्परिणाम तपशीलवार दाखवण्यात आलं होतं. पॉवर पॉइंट वगैरे तर तिथल्या अर्ध्या लोकांना माहीत ही नसावं. पण मुंबईत एखादी नदी आहे हे त्यांना कळायला, २००५ च्या प्रलयामध्ये, दुर्दैवाने दहा वर्ष जावी लागली. आणि हजारो मुंबईकरांचे प्राण. तो वर शासनाला ते प्रेझेंटेशन ही नको होतं आणि मेहनतीने मोठ्या आशेने ते सादर करणारा तडफदार तरुणही.
पक्षाची सत्ता येताच पक्षातल्या सर्वात योग्य, तरुण नेतृत्वाला अनेक अडचणीत टाकून त्याचा रस्ता रोखणं यालाच राजकारण म्हणत असावेत. कारण हा माणूस त्याच्या काकासारखाच तोंडावर खरी खोटी करणारा आहे. आपल्याला इकडे एक याचा काका सांभाळताना नाकीनऊ येतात त्यात हा म्हणजे त्याचं प्रतिरूप... आतून आणि बाहेरून व्यवस्थित अपप्रचाराची नाकाबंदी केली गेली.
याने नवा पक्ष स्थापन केला. आप्त आणि विरोधकांनी कितीही राळ उडवू दे, याला मिळणारा तरुणांचा भरघोस पाठिंबा बघून मग राजकारणातल्या धेंडानीही "पक्ष चालवायला सकाळी लवकर उठलं पाहिजे" अशी सुरसुरी सोडून दिली. तीच टेप माध्यमांनी वाजवत रहायची. याला, याच्या पक्षाला कुठेही श्रेय द्यायचं नाही. राष्ट्रीय पातळीवर याच्या पक्षाच्या आंदोलनाचा विपर्यास करून याला खलनायक बनवायचं हेच धंदे चालू राहिले. दुसऱ्या पक्षातील फुटिरांना कडेवर न घेता, युती आघाडीच्या कुबड्या न वापरता स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या पक्षाची टिंगल, आणि खोटं पसरवण्यात माध्यमं, पत्रकार जोमाने कामाला लागले. याच्या भाषणाला गर्दी होते, पण मत मिळत नाहीत म्हणणाऱ्या लोकांना निवडणुका कशा खेळल्या जातात, आदल्या रात्री आचारसंहिता कोलुन vote banks कशा फिरवल्या जातात हे माहीत नसावं किंवा जाणून बुजून दुर्लक्ष केलं असावं.
निवडणूक जिंकणे हीच लोकशाही असा समज हल्ली आपल्या देशाचा झालेला आहे. आणि त्याची कडवट फळं आपण भोगतोय. या माणसाने वेळोवेळी इशारावजा मतं मांडली पण याला काही भूमिकाच नसते म्हणून परत एकदा अपप्रचार. समोरची परिस्थिती, माणसं जर आपला पवित्रा बदलत असतील तर त्या वर मांडली गेलेली मतं ही बदलणारच. जी गोष्ट तथाकथित पत्रकारांनी करायला हवी, ते प्रश्न याने उपस्थित केले. आणि पत्रकार राजकीय नेत्यांची तळी उचलत राहिले.
राजकारणी, पत्रकार, विरोधक यांना आपल्या सत्याधारीत, तर्कशुद्ध, परखड बोलण्याने त्यांची जागा दाखवणारा हा माणूस त्यांना कसा हवा असेल?
तो नको असलेला माणूसच आहे. पण त्यांच्यासाठी. आणि त्यांना कितीही जोर लावू देत. जबाबदार आणि सुज्ञ नागरिकांना मनोमन हा माणूस आवडतो, हवा आहे... आणि आताच्या त्याच्या प्रगल्भ, संयत रूपाने त्याने अजून बरेच चाहते निर्माण केलेत. एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलाखतीच्या मोस्ट वाँटेड व्हिडिओज मध्ये याचेच व्हिडिओज टॉपला असतात आणि ज्या "उत्तर भारताचा खलनायक" म्हणून याला रंगवलं गेलं होतं, त्या तिथले तरुणही या माणसावर फिदा आहेत हे कमेंट्स मधून कळतं.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. हळूहळू लोकांच्या डोळ्यावरची झुल उतरते आहे. आपण मतदार नाही तर नागरिक आहोत ही भावना हळूहळू जोर धरतेय.
राजकीय दूरदृष्टीचा, कलासक्त आणि कलावंत मनाचा, निसर्ग संवर्धनाची जाणीव ठेवणारा, विकासाची योग्य व्याख्या माहीत असणारा हाच आपल्याला हवा असलेला माणूस आहे... हा माणूस बोलतो ते आपण ऐकायचं असं नाही, तर आपल्या मनातलं हा बोलतोय हे मनोमन अनेक जण मान्य करतायत.
राज ठाकरे. तुम्ही नको असलेल्या राजकीय घटकांनी माध्यमांना, सोशल मीडियाला हाताशी धरून कितीही अपप्रचार केला. तरी येणाऱ्या काळाला, नव्या दमाच्या महाराष्ट्राला तुम्ही हवे आहात. हवेच असाल.
0 टिप्पण्या