अतिशय निंदनीय असलेल्या, त्यांच्या ध्रुवीकरणाच्या रणनीतीमुळे आपण नक्की निवडून येऊ अशी खात्री बाळगणाऱ्या भाजपाला बंगाल मधील घमासान पद्धतीने लढल्या गेलेल्या निवडणुकीचे निकाल म्हणजे एक जबरदस्त धक्का होता. या निकालांनी भाजपच्या विध्वंसक रथाला खीळ घातली. या निकालातून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जवळजवळ २ / ३ बहुमत मिळाले. निकाल जाहीर झाल्या झाल्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात हिंसा सुरु झाली. आत्तापर्यंत किमान १४ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये डाव्या पक्षांचे व इतर संघटनांचे सदस्य आहेत.अनेक घरे जाळण्यात आली आहेत किंवा उध्वस्त केली गेली आहेत. राज्यात दहशतीचे वातावरण आहे. दुर्दैवाने निवडणुकीनंतरची हिंसा बंगालला नवीन नाही. भाजपा, आर एस एस आणि त्यांचे साथीदार मुद्दामहून सांप्रदायिक हिंसा भडकवण्याचा जो प्रयत्न करत आहेत. जन आंदोलनांची संघर्ष समिती - महाराष्ट्र त्याची भत्सना करते आणि त्याला ठाम विरोध करते. हिंसा भडकवण्यासाठी केंद्रीय सरकारची यंत्रणा वापरण्याला विरोध करते. प. बंगालमध्ये राष्ट्रपतींची राजवट लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला समितीचा विरोध आहे. सध्याच्या हिंसेच्या सर्व घटनांची न्याय्य चौकशी व्हावी , दोषींवर गुन्हा दाखल करावा आणि मृत्युमुखी पडलेल्या व हिंसेतून वाचलेल्या नागरिकांना भरपाई मिळावी अशी मागणी समितीने पत्रकाद्वारे केली आहे.
कोव्हीड - १९ ची परिस्थिती हाताळण्यातील त्याची संपूर्ण असंवेदनशीलता व गुन्हेगारी स्वरूपाची गैरव्यवस्था आणि हजारो लोक साथीचे भोग भोगत असल्यामुळे, हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडत असल्याने केंद्रातील भाजपा सरकारची पत अधिकाधिक ढासळायला लागली आहे.उत्तर प्रदेश व कर्नाटकातील स्थानिक पंचायत निवडणुकांमध्ये आणि मध्य प्रदेशमधील एका पोट निवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला आहे. त्यामुळे ते आणखीनच हताश होण्याची शक्यता बळावेल आणि ते वर उल्लेखलेल्या सारख्या किंवा इतरही क्लुप्त्या योजतील अशी दाट शक्यता तयार होईल. त्यांच्या धोरणांमुळे जन्माला आलेल्या प्रचंड मानवी अरिष्टापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवून भाजपा प.बंगालच्या परिस्थितीकडे ते वळवणार नाही याबद्दल अतिशय सावध राहण्याचा आणि दक्ष राहण्याचा हा काळ आहे.
भाजपाच्या प्रचाराला आणि डावपेचांना बळी पडता कामा नये. सांप्रदायिक तणाव आणि हिंसा भडकवण्याचा सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या बनावट वृत्त यंत्रणेचा बुरखा आपण फाडला पाहिजे. राज्यातील २/३ बहुमताने सत्तेवर आलेला सत्ताधारी पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेसची जबाबदारी खूपच वाढते याची आठवण करून देत त्यांनी तातडीने व निर्णायकपणे हस्तक्षेप केला पाहिजे आणि सर्व प्रकारची हिंसा ताबडतोब थांबवली पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत. त्यांना जर शाश्वत पद्धतीने शासन करायचे असेल तर, प. बंगालच्या जनतेनी भाजपाला नाकारले आहे आणि बदल्याचे राजकारण करण्याकरिता नव्हे तर राज्यातील जनतेच्या निकडीच्या प्रश्नाना हात घालण्यासाठी त्यांच्या हाती शासनाची सूत्रे सोपवली आहेत याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे.
आजच्या परिस्थितीत, शत्रू - मित्र विवेकाचे भान ठेऊन, जनतेच्या कौलाला मान देऊन बंगालमधील सर्व पुरोगामी, डाव्या व लोकशाहीवादी शक्तींनी फॅसिस्ट व सांप्रदायिक दंगे घडवू पाहणाऱ्या भाजपाविरुद्ध व हिंसेचा अवलंब करण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध एक संयुक्त ताकद उभी केली पाहिजे असे आवाहन जन आंदोलनांची संघर्ष समिती - महाराष्ट्र करत आहे. समिती तर्फे कॉ.अशोक ढवळे, साथी मेधा पाटकर, साथी प्रतिभा शिंदे, श्री.राजू शेट्टी, कॉ.सुकुमार दामले, विश्वास उटगी / संजीव साने. / नामदेव गावडे / अरविंद जक्का / उल्का महाजन / एम.ए.पाटील / डॉ.एस. के. रेगे / किशोर ढमाले / सुभाष लोमटे / सुनीती सु.र / अजित पाटील / श्याम गायकवाड / ब्रायन लोबो / मानव कांबळे / लता भिसे – सोनावणे / हसीना खान / वैशाली भांडवलकर / वाहरु सोनवणे / फिरोझ मिठीबोरवाला, राजेंद्र कोर्डे यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
https://www.prajasattakjanata.page/2021/05/blog-post_87.html
0 टिप्पण्या