Top Post Ad

ठाण्यात ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू ; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले, लोकांमध्ये प्रचंड संताप;
हॉस्पिटलकडून  मृतदेह ताब्यात न देता पैसे भरण्याची मागणी 
भिवंडीचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली ६ जणांची चौकशी समिती स्थापन


नाशिक नंतर पालघर आणि आता ठाण्यामध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ठाण्यातील वर्तकनगर भागातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार जणांना मृत्यू झाल्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून ठाण्यात ऑक्सिजनची आणीबाणीसदृश परिस्थिती आहे, असाही आरोप आता होऊ लागला आहे. वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला. मृतदेह ताब्यात न देता पैसे भरण्याची मागणी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून केली जात असल्याचा आरोपही काही नातेवाईकांनी केला. यासंदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी या हॉस्पिटलमधील प्रमुख डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.  अरूण शेलार, करूण पष्टे, विजय पाटील, दिनेश पणकार या चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रूग्णांच्या मृत्यूला रूग्णालय जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर रूग्ण अत्यवस्थ होते असं रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. वेदांत रूग्णालयाच्या बाहेर नातेवाईक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.वेदांत हॉस्पिटलमध्ये हा प्रकार चौथ्यांदा घडल्याचेही एका नातेवाईकाने यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांना सांगितले.

 दरम्यान, लोकांमध्ये या घटनेनंतर प्रचंड क्षोभ आणि चीड आहे. लोकांनी आव्हाडांना घेराव घालून आपले म्हणणेही यावेळी मांडले. रुग्ण उत्तम परिस्थितीत असतानाही कसे दगावले असा सवाल नातेवाईकांनी विचारला. आमच्याकडे रुग्णालयातील रेकॉर्डिंग आहे, असा दावाही नातेवाईक करत होते. मृतदेह ताब्यात देण्याआधी सगळे पैसे भरा, अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात असली तरी आमची पैशाबद्दल कोणतीही तक्रार नाही. मात्र आमच्या रुग्णाची स्थिती चांगली असतानाही हे कसे झाले, हे कळले पाहिजे, अशा शब्दांत नातेवाईकांनी आपली कैफियत मांडली.भरमसाठ बिले लावली जात असल्याचीही तक्रार नातेवाईक करत आहेत. त्यांची बिले कमी करून देण्याची मागणीही नातेवाईक करत होते. त्याबद्दल आव्हाड म्हणाले की, बिले कमी करून देण्यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा करून ठरवता येईल. पण ठाण्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. त्यासंदर्भात सातत्याने लक्षही ठेवले जात आहे.

हॉस्पिटलमधील ३५ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात चार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ३५ आणि १२ या दोन क्रमांकांचे अतिदक्षता विभाग आहेत. त्यापैकी ३५ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात ४ मृत्यू झाले आहेत. ऑक्सिजनचा साठा कमी असेल तर मृत्यूचे प्रमाण जास्त असते. तरीही चौकशी समिती यासंदर्भात अंतिम निष्कर्ष काढेल मग निर्णय घेतला जाईल. भिवंडीचे आयुक्त पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली ६ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात डॉक्टर्स आणि प्रशासकीय अधिकारीही आहेत. ते या प्रकरणाची चौकशी करतील. 
 -- गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड 

 सदर घटना ही दुदैवी असली तरीही यात नक्की चूक कुणाची ते शोधून काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये आयएएस दर्जाचे अधिकारी असणारे भिवंडी मनपा आयुक्त, ठाण्याचे सिव्हिल सर्जन आणि अन्य चार डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती आजच्या आज या घटनेची चौकशी करून आपला अहवाल प्रशासनाला सादर करेल. या अहवालात जे कुणी दोषी ठरेल त्याच्यावर कठोर कारवाई करणार . - पालकमंत्री एकनाथ शिंदे

 वेदांत हॉस्पिटलमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करून चौकशी करावी. तसेच दोन दिवसांत दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं जिल्हाधिका-यांकडे केली आहे. वर्तकनगर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्देवी असून, निष्काळजीपणामुळे झाली असल्याची भारतीय जनता पक्षाची भावना आहे. संबंधित हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी कोणाकडे होती? ऑक्सिजन साठा संपुष्टात येत असतानाही तातडीच्या उपाययोजना का केल्या नाहीत? पुरेसा ऑक्सिजनसाठा ठेवण्याची दक्षता का घेतली गेली नाही? या दुर्देवी घटनेला वेदांत हॉस्पिटलचे व्यवस्थापन, ठाणे महापालिका यांच्यापैकी कोण जबाबदार आहे? या विविध मुद्द्यांबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून सखोल चौकशी करावी. तसेच दोषींवर दोन दिवसांत कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांकडून कोणतेही बिल घेऊ नये अशीही मागणी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com