नवी मुंबई
नवी मुंबई, मधील भाजप नगरसेविका सौ अपर्णा नवीन गवते, नगरसेविका सौ दिपा राजेश गवते, राजेश गवते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सर्वा.उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे आदी उपस्थित होते.
दिघा गावठाण, सिडको आणि MIDC मालकीच्या जागा परस्पर विकून तसेच त्यावर अनधिकृत ईमारती बांधून आणि त्यातील घरे गोरगरिबांना बेकायदेशीररीत्या विकून, गडगंज संपत्तीधीश झालेल्या नवीन गवते व त्यांच्या परिवाराने आज (२९ डिसेंबर) अचानक नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक आणि भारतीय जनता पार्टीची साथ सोडून, शिवसेनेत प्रवेश केला मात्र यामागे खरे कारण काय आहे. गवते परिवार स्वत:हून शिवसेनेत गेला कि, पाठवला आहे? याबाबत उलटसूलट चर्चा सुरु आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुकी जस-जशी जवळ येत आहे. तसतसे, सातत्याने नगरसेवक पद भूषविणारे आणि विशेषतः आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक खासकरून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. नवीन गवते यांवर नुकताच शिवसेनेच्या एका दिघास्थीत पदाधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये, नवीन गवते व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांना अटक होण्याची शक्यता होती. म्हणून, गवते परिवारातील सर्व तिन्ही नगरसेवक-नगरसेविका यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
तर, आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असणारे व माजी आमदार संदिप नाईक यांच्या विशेष मर्जीतील नवीन गवते साथ सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत. परंतु, याच गवते परिवाराच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये रोष आहे. व या रोषाला ऐन निवडणुकीच्या मौसमात शिवसेना मोठ्याप्रमाणात हवा देऊ शकते. ज्यामुळे, आपसूकच आ. गणेश नाईक व भाजपला राजकीय किंमत मोजावी लागू नये. यासाठी तर गवते परिवाराला शिवसेनेत पाठवण्यात आले नाही ना? अशीही चर्चा सुरु आहे. पक्ष कोणताही असो, आमदार गणेश नाईक यांना सोडून गेलेले सर्वच नेते व नगरसेवक नाईकदादां'च्या विरोधात बोलण्यास स्वतःला मर्यादित ठेवतात. ज्याचे, उत्तम उदाहरण म्हणजे “विजय चौगुले. एम.के. मढवी, विठ्ठल मोरे आणि सुरेश कुलकर्णी”.! त्यामुळे, गणेश नाईकांशी फारकत घेणारे नगरसेवक हे “गेलेले नसतात तर पाठवलेले असतात”, असे मत नवी मुंबईतील नागरिक खाजगीत करत आहेत.
0 टिप्पण्या