... म्हणून मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले होते
मुंबई :
एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णयनंतर राज्याच्या राजकारणात अनेक गौप्यस्फोट होऊ लागले आहेत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना झालेल्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केल्याने मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले होते. मला तिकिटही नाकारण्यात आले होते. आता खडसेंच्या बाबतीतही तेच घडलेय, असा आरोप शेंडगे यांनी केला आहे.
खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मी दिवंगत गोपीनाथ मुंडेंसोबत राजकीय जीवनात काम केले होते. त्यांच्यासोबत ओबीसी समाजातील अनेक नेते होते. एकनाथ खडसे हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. २०१४ मध्ये ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र त्या मागणीमुळे मला पक्ष सोडावा लागला होता. निवडणुकीत माझं तिकीटही कापण्यात आलं होतं, असा दावा शेंडगे यांनी केला.
दरम्यान एकाही राजकीय पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप यांनी माझ्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी केलेली नव्हती, विधानमंडळात कोणी आक्षेप घेतला असेल, चौकशी करा असं म्हटलं असेल तर मी एका मिनिटात राजकारण सोडायला तयार आहे. राजीनाम्याची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला असं विधान खडसेंनी भाजपा सोडताना केलं होतं. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले, तेव्हा भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार म्हणून एकनाथ खडसेंचे नाव घेतले जात होते, मात्र प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाले आणि एकनाथ खडसेंच्या वाट्याला महसूल मंत्रीपद आले. त्यावेळी झालेल्या आरोपांमुळे खडसे यांना मंत्रिपदाचा त्याग करावा लागला होता.
0 टिप्पण्या