जोशी-बेडेकर महाविद्यालयापुढे ठाणे महापालिकेची माघार
ठाणे
ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या निर्णयाला विद्या प्रसारक मंडळानं विरोध केला होता. शैक्षणिक प्रक्रिया सुरू असताना क्वारंटाईन सेंटर उभारल्यास शिक्षणात व्यत्यय येण्याची भीती दाखवली जात होती. मात्र कोरोनाच्या महामारीत सर्वच शैक्षणिक क्षेत्रे बंद असल्याने महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम होती. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने हा वाद न्यायालयात नेला होता. न्यायालयानं महापालिका आणि महाविद्यालय प्रशासनाने आपापसात तडजोड करावी असे निर्देश दिले होते. या तडजोडीसंदर्भात बैठका होऊनही मार्ग निघत नव्हता. अखेर महापालिकेेनेच २१ जुलैच्या दरम्यान क्वारंटाईन सेंटर करण्याचा निर्णय मागे घेतला. हा निर्णय मागे घेऊनही जवळपास दोन आठवडयाहून अधिक काळ क्वारंटाईन सेंटरची साधनसामुग्री हलवली नव्हती. ही साधनसामुग्री हलवण्यास सुरूवात झाली आहे.
शैक्षणिक कार्य सुरू असताना क्वारंटाईन सेंटर उभारणं अयोग्य असल्याचं मंडळाचं म्हणणं होतं तर महामारीने ठाण्यात प्रचंड रुप धारण केले असल्याने जागा अपूरी पडत आहे. म्हणून क्वारंटाईन सेंटरसाठी थोडी तरी जागा द्यावी अशी महापालिकेची भूमिका होती. मात्र दोन्ही बाजू ठाम राहिल्यामुळे अखेर विद्यार्थ्यांचं हित पाहून महापालिकेनं ही जागा क्वारंटाईन सेंटरसाठी अधिगृहित न करण्याचा निर्णय घेतला आहे. असं महापालिकेने म्हटले असले तरी यामध्ये एका बड्या राजकीय नेत्याने मध्यस्थीची भूमिका बजावली असून पालिकेवर दबाव आणला असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
ठाणे महाविद्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या शाखांच्या मिळून सहा ते सात इमारती आहेत. त्यापैकी एखाद्या इमारतीत क्वारंटाईन सेंटर झालं असतं तर जवळच्या नागरिकांची सोय करता आली असती. मात्र महाविद्यालय प्रशासनाच्या आडमुठे धोरणापुढे महापालिकेला नमतं घ्यावं लागलं आहे. काही वेळा याबाबत आग्रही भूमिका धरल्यानं हा वाद वाढला होता पण आता महापालिकेने माघार घेतली आहे. त्यामुळे येथे उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरच्या सामानसुमानाची हलवाहलव महापालिकेनं आज १० ऑगस्ट रोजी सुरू केली आहे.
0 टिप्पण्या