Top Post Ad

निढळाच्या घामाने जमवलेला गरीब जनतेचा पैसा स्विकारणे  बेशरमपणाचे

निढळाच्या घामाने जमवलेला गरीब जनतेचा पैसा स्विकारणे  बेशरमपणाचे


गुरुवार ता.28 ऑक्टोबर 1954 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्य पुरंदरे स्टेडियम,मुंबई येथे भरविण्यात आलेल्या अपुर्व सोहळ्यात 1 लक्ष 18 हजार रुपयाची थैली अर्पण करण्यात आली.*
हा सर्व पैसा डॉ. बाबासाहेबांनी आपल्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी उपयोगात आणावा अशी विनंती हिरक महोत्सव समितीचे सेक्रेटरी शा.अ. उपशाम आणि आर.डी. भंडारे यांनी केली.त्याच्या विनंतीचे सभेला जमलेल्या 30 हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. परंतु माझ्या सारख्या बॅरिस्टरने आपल्या निढळाच्या घामाने जमवलेला गरीब जनतेचा पैसा स्विकारणे  बेशरमपणाचे आहे'असे उद्गार काढून डॉ.बाबासाहेबांनी ती सर्व रक्कम मुंबईला बांथण्यात येणाऱ्या इमारत फंडाला दिल्याचे जाहीर केले.
    एकशे पन्नास च्या वर संस्थेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना हारतुरे अर्पण करण्यात आले,त्याच्या समवेत सौ.माईसाहेब आंबेडकर याही होत्या.अध्यक्षस्थानी आर. डी. भंडारे होते.सिद्धार्थ कॉलेजचे प्रिंन्सिपॉल पाटणकर, प्रा.व्ही.जी. राव, रा.ब.बोले,  दादासाहेब गायकवाड. आर.आर. भोळे, जनताचे संपादक यशवंतराव आंबेडकर, प्रा. बोराळे, अनंत हरी मद्रे , ब.ह.वराळे, डी.जी. जाधव,शांताबाई दाणी वगैरे मंडळी हजर होती.


     डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
मित्रहो,
          आपण ही जी थैली,एक लाख अठरा हजार रुपयाची दिली आहे खरी,पण ती ती अगदीच हलकी आहे (हंशा) मला थोडासा संशय आला.तरी हा जो मोठा आकडा मॅनेजिंग ट्रस्टी यांनी जाहीर केला आहे त्याची सारी जबाबदारी मी त्यांच्याकडे सोपवित आहे.
        खरे म्हणजे माझा हीरक महोत्सव साजरा करून त्याप्रित्यर्थ ही थैली देण्यात आली,असे आताच सांगितले.हीरक महोत्सव हे माझं आहे.हे पैसे तुमचे असून एक हॉल बांधण्यासाठी जमा केले आहेत.त्याला मूर्त स्वरूप यावं म्हणून मी ते माझ्या वयाच्या साठाव्या वर्षी द्यावे असे फक्त म्हटलेले आहे.हा फंड गोळा करायला सुरवात बऱ्याच वर्षापूर्वी झाली. 1942 साली माझी एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमधे नेमणूक झाल्यामुळे मला मुंबई सोडून जावं लागलं.तेव्हा पैसा गोळा करण्याचं काम जरा जास्त सुस्त झालं होतं म्हणून 1952 साली परत आल्यावर पुन्हा ते काम हाती घेतलं.पण दुर्दैवाने इमारतीसाठी जी जागा घेतली होती तिथं भाडोत्री घातल्यामुळे इमारतीचे काम सुरु करता येईना.भाडोत्रीही काढून टाकणं अशक्य झालं आहे.आता सांगायला काहीच हरकत नाही.मी थोडसं वजन खर्च करून मुंबईचा  कायदा बदलून घेतला आहे. त्या कायद्यामुळे ते भाडोत्री आता निघून जातील व इमारतीचे काम सुरु होईल.मी हे जे केले ते जनतेसाठी केले आणि ही जी रक्कम जमा झाली आहे ती तुमचीच आहे.आपल्या समाजातील वा दरिद्री बाबा-पुरूषांच्या निढळाच्या घामातून गोळा केलेला हा पैसा आहे आण मी बॅरिस्टर आहे.एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचा मेंबर होतो.तेव्हा प्रकृतीच्या निमित्ताने या गरीब जनतेचा पैसा घेणे बेशरमेची गोष्ट आहे.तेव्हा हा सर्व पैसा,एकदा मी सांगून टाकल्याप्रमाणे इमारतीसाठी खर्च केला जाईल.मला त्यातली एक छदामही नाही,असे येथे जाहीर करतो.(टाळ्यांचा गजर)_
        मित्रहो ! आज या ठिकाणी बसलो असतांना माझ्या पूर्व आयुष्यात ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व चित्रपटासारख्या उभ्या राहतात.मी जन्मलो कुठे, माझ्या वडिलांनी कुठं कुठं मला नेलं,माझं काय काय केलं हे सारं डोळ्यापुढे उभं राहिलं आहे परंतु मला इथं एक गोष्ट सांगायची आहे ती ही की, माझ्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली याला पुरावा तरी काय आहे ? (हशा) मी कोणत्या साली जन्मलो याचा रेकॉर्ड नाही.तेव्हा त्यांना मी त्यांचा मुलगा म्हणून काहीच महत्व वाटलं नाही.जन्म तारीख लिहून ठेवली नाही.आज जी जन्म तारीख आहे ती खरीच आहे असं कोणी सांगू शकत नाही.
        परंतु माझ्याविषयी दोन तीन गोष्टी निश्चित सांगता येतील.राजपुतान्यात महू मुक्कामी मी जन्मलो.त्यामुळे कोकणाचा माझा काही संबंध राहिला नाही.वडील कोकणातले. परंतु नोकरीमुळे त्यांना राजपुतान्यात जावे लागले. तेव्हा जन्म महू मुक्कामी झाला हे मात्र नक्की दुसरी गोष्ट म्हणजे माझा जन्म  बाराच्या ठोक्यात झाला. त्यामुळे माझे वडील कामावर होते आणि माझ्या आईचं बाळंतपण चाललं होतं. माझा पिंड फार मोठा होता.माझ्या आईला फार त्रास झाला,असे म्हणतात. माझ्या वडिलांना चिंता वाटत होती. परंतु एकदा दाईंनी त्यांना येऊन सांगितले "घरात जा.मुलगा झाला".
        तिसरी गोष्ट म्हणजे मी मूळ नक्षत्रावर जन्मलो आणि ज्योतिष्याने सांगितले की हे मूल फार वाईट आहे. याची आई लवकरच मरेल. यामुळे इतर भावंडांना मी अतिशय अप्रिय झालो. जे ते झिडकारीत व म्हणत 'हे मूल आईला वाईट आहे' शेवटी आमची आई लवकरच वारली. ह्या अशा माझ्या जन्माविषयी तीन गोष्टी सांगता येईल.
       माझं बालपण म्हणाल तर माझं मलाच आश्चर्य वाटतं. मी बारा तेरा वर्षाचा होईपर्यंत सर्व लोकांना अशी खात्री वाटत होती की हे पोर घराण्याला काळिमा लावणार. याच्या हातून काही होणार नाही. कारण मी बारा तेरा वर्षाचा होईपर्यत लंगोटीशिवाय दुसरी वस्तूच नेसलो नाही(हंशा) . शिवाय दारोदार गावच्या बायकांना विचारी की "तुमची लाकडं फोडायची आहेत काय ?" मला शिक्षणात प्रथम काही राम वाटेना.आई वारल्यावर माझं संगोपण आत्याने केले. मला वाटे शिकून काय करणार ? सहा महिने मी माळ्याचा धंदा केला.मिलिटरी कॅंपात बाग बागाईत असायची. येथील माळ्याच्या पोरांशी संगत केली. माती,दगड उचलले.जागा साफ केली. नळानं पाणी बागेला द्यायचं होतं पण ते काही होईना. तेव्हा मी घरावरची सर्व कौलं काढली आणि त्याच्या नाल्या  केल्या होत्या. काय पण माझं आयुष्य असं वाटतं.
        साताऱ्याला जेव्हा आम्ही होतो तेव्हा इतर सुभेदार नातेवाईकही होते.त्यांच्या घरासमोर एक उकिरडा होता. शेणकचरा होता आणि त्या उकिरड्यवर  एक उंबराचं झाडही होतं. मी झाडावर चढण्यात फार पटाईत वानर देखील इतक्या लवकर चढणार नाही.आता पायाने अशक्त झालो. त्या झाडावर मी चढे आणि त्यावर कांबळ टाकून झोपत असे, व लहर आली की त्या उकिरड्यावरील राखेत उडी घेत असे. त्यावेळी साताऱ्याला प्लेग होता. लोक म्हणत,बरेच लोक प्लेगने मेले आणि या पोरालाच प्लेग का होत नाही. ही अशी माझी परिस्थिती.  असं हूडपणाचं माझं बालपण गेलं.
     घरात बऱ्याच लोकांनी लडिवाळपणानं वागवलं. आमची आत्या होती.तिचा मी फारच लाडका.तिने सर्वाना ताकीद  दिली होती. 'आईविना पोरगं आहे.त्याला धुसफूस करू नका' आणि यामुळेच मी स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. सर्वाना वाटे की ह्या पोराच्या हातून काही होणार नाही. ज्यांनी माझे लालन पालन केले त्यातील कोणी जगली नाहीत. ते आज हे माझे कौतुक पहायला हजर असते तर मला फार आनंद झाला असता.अशा प्रकारे माझे बालपण गेले. तुम्हांला कल्पना असेल माझ्या आयुष्यात किती क्रांती झाली. मी गुराखी झालो असतो किंवा काबाडकष्ट करणारे काम केले असते तर ह्या पदाला पोहोचलो नसतो. माझे वडील मला नेहमी सांगत 'सावलीतले काम शीक' या साऱ्या आठवणी एकत्र करून एक चरित्र लिहावे असा माझा विचार आहे (टाळ्यांचा कडकडाट) पण चरित्र नाहीतर एक लहानसे 'माझे बालपण' म्हणून चरित्रपर  पुस्तक लिहीणार आहे.त्यात सर्व गोष्टी मी सविस्तर देईन.
        माझ्यामधे काही उपजत गुण होते आणि म्हणून मी या पदाला पोहोचलो,असं काही नाही.माझं आयुष्य जसं चाललं तसं चालू दिलं असतं तर मी एक नीतिपर माणूस झालो असतो.पण माझ्या आयुष्याला जे काही वळण मिळालं ते का मिळालं,याचे कारण मी देणार आहे.
        माझे तीन गुरू आहेत.प्रत्येकाला गुरू असतातच,तसे मलाही आहेत.मी काही सन्यासी  नाही की बैरागी नाही.पण मला गुरू आहेत.माझे पहिले गुरू आणि श्रेष्ठ गुरू बुद्ध होत.
       माझे वडील विद्येचे भक्त होते, तसेच ते धर्माचे चाहते  होते. माझ्या लहानपणी रामायण,महाभारत इत्यादी सर्व ग्रंथाची त्यांनी माझ्याकडून पारायणे करवून घेतली होती. रामायण,महाभारत वाचून माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला. माझे वडील मला म्हणत, "आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं काही कारण नाही. तू विद्वान का होऊ शकणार नाहीस?" एकदा मी कोणती तरी परीक्षा पास झालो होतो.त्यावेळी चाळीतल्या लोकांनी माझ्या वडिलांची इच्छा नसताही माझा सत्कार करायचं ठरविलं. माझे वडील म्हणायचे, नको सत्कार, मुलांचा असा सत्कार केला म्हणजे त्यांना पुढारी झालो असे वाटते.(हंशा आणि टाळ्यां)  शेवटी सत्कार झालाच आणि दादा केळुसकरांनी  मला बुद्धाच्या चरित्राचं एक पुस्तक बक्षीस दिलं. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काही निराळाच प्रकाश पडला.मारुती, सिता, राम वनवासात गेले, धोब्याच्या सांगण्यावरुन सीतेचा त्याग, कृष्णाच्या सोळा सहस्त्र बायका ह्या गोष्टी काहीतरी भयंकर वाटल्या.ह्या गोष्टी माझ्या मनाची पकडच घेईनात. परंतु बुद्ध धर्माच्या  अभ्यासाने मला जास्त अभ्यास करावासा वाटला. त्या धर्माची पकड माझ्या मनावर कायमची आहे व माझी अशी ठाम खात्री झाली आहे की जगाचं कल्याण   फक्त बुद्ध धर्मच करू शकेल.हिंदू लोकांना आपलं राष्ट्र जगवायचं असेल तर बुद्ध धर्मच स्वीकारला पाहिजे असं माझं नेहमीच सांगणं आहे.
     माझे दुसरे गुरू कबीर होत. माझे वडील कबीर पंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्त्वाचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे खरे रहस्य कळले.मी मोठा कोणालाच म्हटले नाही . गांधीला  मी महात्मा म्हटले नाही. कारण कबीराने म्हटले आहे,मानस होना कठीण है ! तो साधु क्या बने ! जो माणूस झाला नाही तो महात्मा कसा होईल?
         माझे तिसरे गुरू म्हणजे ज्योतिबा फुले होत. ब्राम्हणेतरांचे खरे गुरू तेच होत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी,महार, मांग, चांभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकविले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही ज्योतिबाच्या मार्गांनेच जात होतो.पुढे मराठे आमच्यातुन फुटले. कोणी कॉंग्रेसमधे उष्टे खाण्यासाठी गेले व त्यां पैकी आमचे रा.ब.बोले हे हिंदू महासभेत गेले. ते येथे हजर आहेतच.कोणी कोठेही जावोत,पण आम्ही मात्र जोतीबांच्याच मार्गानी जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा दुसरे काही घेऊ पण जोतीबांचा मार्ग सोडणार नाही.हे असे माझे तीन गुरू आहेत.यांच्या शिकवणीने माझे आयुष्य बनले  आहे.
        यानंतर माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. कोणाची मरीआई, खंडोबा, अशी दैवतं असतात,तशी माझी तीन दैवतं आहेत.
        माझे पहिले दैवत विद्या होय. विद्ये शिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वाना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध धर्म आहे.येथे भेदभाव नाही. श्रमण, भिक्षु , ब्राम्हण, भंगी मग तो कोणीही असो, सारे एक आहेत. माझ्या संघात येण्यापुर्वी नदी, नाला, 8मग नाव कोणतेही असो, यनुना असो, ब्रम्हपुत्रा,गंगा, गोदावरी कोणतीही नदी असो त्या सर्व नद्या आपल्या प्रांतातुन सागरात गेल्या.त्याचं पाणी एक झालं की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे यमुनेचं की हे गंगेचं, की हे गोदावरीचं ! तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे. जात पात नाही. तुम्ही सर्व एक आहात. तुझी विद्येची आवड आहे ना मग ती सफल कर. ज्याप्रमाणे माणूस जगायचा असला तर अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येचीही आवश्यकता आहे.ज्ञानाशिवाय तो काय करू शकेल ?  ब्रम्हदेशात शेकडा 90 लोक सुशिक्षित आहेत.आज हिंदुस्थानात शेकडा 90 लोक निरक्षर आहेत. याचे कारण ब्राम्हणानी आम्हांला विद्या दिली नाही हेच होय. धर्माचे कायदे आमच्या आड आले आणि आमची विद्या हिरावून घेतली.  दगडाची पूजा करणारे भाविक आमच्यात सर्वच आहेत. तुकोबाने एक ठिकाणी म्हटलं आहे, नवसे कन्या पुत्र होती ! तरी कासया करणे लागे पती !!
याचे कारण त्यांना विद्या दिली नाही.अत्यंत मोठी वस्तू आहे ही विद्या.माझे विद्येचे वेड भयंकर आहे. ब्राम्हणांच्या घरी नाहीत इतकी पुस्तके आता दिल्लीला मजजवळ आहेत. एकूण वीस हजार पुस्तके आहेत मजजवळ ! आहेत कोणा ब्राम्हणाजवळ ? दाखवून द्यावीत त्यांने ! ठाकूर आणि कंपनीची माझ्यावर हजाराची उधारीची बीलं थकलेली आहेत.मला उधारीचा माल कुठेही मिळतो.जिथे माझी उधारी थकली. तिथं मी दारातच मोटार उभी करतो, इतके माझे विद्येविषयीचं वेड आहे.मी विद्येची पूजा 24 तास करीत असतो.
     माझे दुसरे दैवत स्वाभिमान होय. मी कोणाची याचना केली नाही. माझं ध्येय असं होतं की पोट तर भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवाही केली पाहिजे. डॉ. परांजपे यांच्या विनंतीने एका महाविद्यालयात एकॉनॉमिक्सचा प्रोफेसर झालो. तेव्हा मला त्यांनी तेरा व्याख्यानं देण्यासाठी सांगितले. मी म्हणालो फक्त चार व्याख्याने   देईन. पटलं तर ठेवा नाहीतर माझा मार्ग मला मोकळा आहे. कारण मला माझ्या लोकांची सेवा करायची होती. त्यासाठी वेळ हवा होता. पोयबावडीच्या नाक्यावरच्या 48 व 50 नंबरच्या खोलीत मी कण्याचा भात आणि कण्याची  भाकरी खाल्ली. पण समाज सेवेला सोडून भारी पगाराकडे वळलो नाही. मार्ग निघाला. लोकांनी थैली स्वीकारुन घर बांधली. माझ्या माहितीच्या एका पुढार्याने म्हणे 47 हजाराच्या प्रॉमिसरी नोटा लिहून दिल्या होत्या आणि लोकांनी जेव्हा लाखभर रुपयाची थैली अर्पण केली तेव्हा ते फेडले .  मला तसे करायचे नाही . मे माझे स्वतःचे पोट स्वतःच भरून जी काही सेवा करायची ती केली. नोकरी मला करायची नव्हतीच. कोणीही गव्हर्नर जनरल येवो त्याच्याशी माझी मैत्री असे. परंतु मी कोणाजवळही  याचना केली नाही की मला अमुक बनवा किंवा मला ही जागा द्या. हो, दुसऱ्यासाठी मी काही केलं असेल पण स्वतःसाठी एक बोट भर चिट्ठी लिहिल्याचं कोणी दाखवून द्यावं.एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर व्हावं ही मात्र माझी दांडगी इच्छा होती,ती पुरी झाली. आता मला ना पेन्शन ,ना पगार, ना प्राव्हिडंड फंड ! काही नाही. एकदा इंग्रजांच्या राज्यात कौन्सिलरशिप पत्करली. एकदा कॉंग्रेसच्या राज्यात. पण तेथेही कॉंग्रेसशी माझा खटका उडाला. मला जज्ज होता आलं असतं. पण अडकून घेऊन करणार काय? तेव्हा माझं सांगणं हेच की दीनता असू नये.मी काहीतरी आहे असं मानलं पाहिजे. मी परमेश्वराला देखील कमी मानतो इतका माझा स्वाभिमान तळपता आहे.
        आणि माझं तिसरं दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक,आत्मसिद्धीकरिता पाप केलं, असं मला आठवत नाही.याबाबत मला मोठा अभिमान वाटतो.मी विलायतेला अनेक वेळा गेलो. पण अजून दारू प्यालो नाही. विडी प्यालो नाही.मला कसलं व्यसन नाही. पुस्तक आणि कपडा या गोष्टी अधिक प्रिय आहेत.शील संवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे मला सांगायला फार अभिमान वाटतो. अशाप्रकारे माझे तीन गुरू आणि तीन दैवते या पदाला मी पोहोचलो ते त्यांच्याच शक्तीमुळे होय. मी मात्र केवळ कारण आहे . त्यांचा मी बनलेला एक पुतळा आहे. तेव्हा याचं अनुकरण करा. तुम्ही माझा समारंभ केलात तो व्यक्ती करिता केला नसून या तीन दैवतांचा आदर्श म्हणून त्यांचा कृतार्थ होण्यासाठी केलात असं म्हणून मी ही थैली स्विकारीत आहे.
    "1919 सालापासून म्हणजे गांधीनी पाय टाकला तेव्हा पासून मी राजकारणात आहे. तरीही त्यांचं माझं जुळलं नाही.अनेक प्रकारच्या खटापटी आम्ही केल्या. महाडच्या पाण्याचा सत्याग्रह, नाशिकचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, नानाप्रकारचे सत्याग्रह केलेत.परंतु कोणी सहानुभूती दाखविली नाही. वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्रे येत.बातम्या येत नसतं . मी बहिष्कृत भारताचा संपादक होतो.1919 पासून 1942 पर्यत मी संपादक होतो. एकदा केसरीला जाहिरात पाठविली. त्याचबरोबर जाहिरातीचे बिल रू 3 ची मनीऑर्डरही पाठविली.पण परत आली. कारण जागा नाही म्हणून.टाईम्स ऑफ इंडियाला फोन केला.त्यांना वाटले कुठली ही भिकारडी त्रास द्यायला लागली.त्यांचेही उत्तर नाही आणि आता सारखे पाठीमागे लागतात रिपोर्ट द्या म्हणून. ही अशी परिस्थिती. इतक्या थराला आमची चळवळ गेली.
       मी खरोखरच महार लोकांचा अतिशय ऋणी आहे. महार लोकांच्या बळावरच मी हे करू शकलो.हा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे.महार रणशुर आहेत,लढू शकतात, त्याग करू शकतात.इतर कोणतीही जात हे करू शकत नाही.तेव्हा माझ्या दृष्टीने त्यांचे माझ्यावर अनेक उपकार झाले आहेत.मी येथे जातीवाचक उच्चार करतो याबद्दल कोणी आरोप करील.पण मी या जातीत जन्मलो याबद्दल मला मोठा अभिमान आहे.या परिस्थितीला अस्पृश्य समाज आला त्यांचे बरेचसे श्रेय तुम्हा पुरुषांना आहे.त्यात स्त्रियांचाही  मोठाभाग आहे. 30 वर्षापूर्वी स्त्रिया फार वेडगळ आणि गलिच्छ राहत.मला त्यावेळी स्त्रिया 'बामण' आहे असं म्हणत ' आम्हाला नाही बामण व्हायचं---असं म्हणत.आजची तशी स्थिती नाही.परंतु अजूनही आपण शिखरावर पोहोचलो नाही.मध्यावर आलो आहोत.कठडा चढत आहोत. कधी पाय घसरेल सांगता येत नाही.अजूनही संकटस्थिती मानली पाहिजे. मी पुढारी का, तो पुढारी. हे भांडण आता मिटविले पाहिजे.
        सार्वजनिक कार्याला मदत करा.हजारो प्रकारच्या संस्था दानधर्म करून जातीचा उध्दार करतात.कोकणस्थ ब्राम्हण,देशस्थ ब्राम्हण, सारस्वत ब्राम्हण,प्रभू इ. ब्राम्हणांच्या संस्था आहेत. त्यांनी आपल्या जातीच्या विध्यार्थ्यांना विलायतेला पाठविले आहे.मोठ्या हुद्याच्या जागा मिळवून दिल्या आहेत. त्या गोष्टी ध्यानात घेऊन महिन्याला एक रुपया द्यायचं ठरविलं तर वर्षाकाठी कितीतरी कार्य होईल.
     माझी आता म्हटली तर आठ दहा वर्षच राहिली आहेत.बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून भागणार नाही. मी आता राजकारणापासून अलिप्त होणार आहे.तुमचं जीवन तुम्हीच उज्वल करायचं आहे . त्याग,चिकाटी,निस्वार्थीपणा, बळ एकवटून कार्य करा.मला माझ्या हयातीत तुम्ही आपलं काय करता ते पाहू द्या. मेल्यावर तुम्ही भलं केलं की वाईट केलं हे मला कळणार कसं? हे माझं तुम्हाला निक्षून सांगणं आहे"
संदर्भ जनता - 6 नोव्हें 1954


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com