पावसाची दमदार हजेरी... जोर कायम राहणार - वेधशाळेचा अंदाज
मुंबई/ठाणे
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बराच कमी झाला आहे. गेल्यावर्षी आजपर्यंत २ हजार ६९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर यंदा आजपर्यंत १७१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजे जवळपास ९८० मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. मात्र ३ ऑगस्टच्या रात्रीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ठाणेकर सुखावले आहेत. सकाळी साडेआठ पर्यंतच्या गेल्या २४ तासात एकूण १९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. सावरकरनगर, मुलुंड चेकनाका, सह्याद्री सोसायटी, कापुरबावडी, हजुरी, दमाणी इस्टेट, टेकडी बंगला, हिरानंदानी इस्टेट या काही भागात पाणी साचण्याच्या तक्रारी होत्या. रात्री अडीच ते साडेतीन या काळात २८ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतरच्या एक तासात म्हणजे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान १४ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतरच्या एक तासात म्हणजे साडेचार ते साडेपाच या काळात ४५ मिलीमीटर पाऊस झाला. तर साडेपाच ते साडेसहा या काळात ४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे उपवन तलाव ओसंडून वाहू लागला आहे. ठाण्यात काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसानं कालपासून पुन्हा हजेरी लावायला सुरूवात केली आहे. काल रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे उपवन तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
दरम्यान मुंबई आणि महानगरात पावसाचा कहर अजून सुरुच आहे. अशात मुंबई हवामान विभागानं येत्या 24 तासांत कोकण पट्यात अतीमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि कोरोनाच्या संकटात बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना आजही अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे. तर पुणे वेधशाळेने येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.
गेल्या 12 तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दीडशे मि.मी. पेक्षा जास्त पावसासह पश्चिम उपनगरात पावसाचा जास्त परिणाम पाहायला मिळाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात सुमारे 300 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या 81% पावसाची नोंद झाली आहे. पण सततच्या पावसामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.
0 टिप्पण्या