नियोजनशून्य सोनारी ग्रामपंचायतीला सर्वोच पुरस्काराने सन्मानित करा
ग्रामपंचायत सदस्य अंकुश तांडेल यांची मागणी
उरण
सोनारी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विविध समस्या आहेत. त्याबद्दल नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, पाठपुरावा केल्या तरी त्या समस्यांबाबत कोणतेही योग्य कारवाई होत नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत असून ग्रामपंचायतीच्या या नियोजनशून्य कारभाराचा निषेध करत आहेत. याबाबत नियोजनशून्य सर्वोच्च ग्रामपंचायत पुरस्कार देऊन सोनारी ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात यावा अशी मागणी मनसेचे कार्यकर्ते तथा सोनारी ग्रामपंचायत सदस्य अंकुश तांडेल यांनी केली आहे.
सोनारी गावच्या लोकांना 5 ते 6 दिवसा आड पाणी पुरवठा होतो. लेखी तक्रार केल्यास दर 3 दिवसांनी पाणी सोडले जात आहे असे उत्तर मिळते पण पाणी 5, 6 दिवसांनी येते. त्यासाठी एकदाच पाणी साठा करून ठेवावा लागतो. जास्त पाणीसाठा केल्याने डेंगू सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सोनारी गांवात शाळेसमोरील मैदानाची अवस्था अक्षरशः डम्पिंग ग्राउंड सारखी झाली आहे. कचऱ्या मुळे दुर्गंधी सर्वत्र पसरत आहे यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीवितेला धोका निर्माण झाला आहे.याबाबत नागरिकांनी तक्रारी, सूचना करूनही त्यांच्या तक्रारी व सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. या समस्यांवर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
गटारांची अवस्था तर पूर्णपणे धोकादायक व बिकट झाली आहे. गटाराचे झाकण उघडे आहेत. अनेक ठिकाणी गटारे खराब झाली आहेत. पाणी गटाराच्या बाहेर येऊन रस्त्यावर येत आहे. गटारात एखादा माणूस पडला तर त्याला गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व येऊ शकते एखाद्याचे जीव जाण्याचाही शक्यता नाकारता येत नाही. अश्या पार्श्वभूमीवर या समस्यावर भुयारी गटारे बांधणे गरजेचे आहे. पण तसे केले जात नाही. सोनारी गावच्या स्म्शान भूमीवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र कचराच कचरा आहे. येथे साफसफाई नियमित होत नसल्याने या घाणीच्या दुर्गंधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी व सूचना करूनही या सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. सोनारी गावात सर्व्हीस सेंटर असून गाडी धुण्याचे मळीयुक्त पाणी नाल्यावाटे जाते तसेच तेच घाण व दुर्गंधी, केमिकल युक्त पाणी नागरिकांच्या घरासमोर जात आहे. यामुळे आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत समिती, तहसीलदार उरण, पोलीस ठाणे पोर्ट विभाग आदी ठिकाणी तक्रार करूनही या समस्या जशास तश्याच आहेत. त्यामुळे नियोजन शून्य ग्रामपंचायतच्या कारभारामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे. या सर्व समस्यांमुळे सोनारी मधील ग्रामस्थ प्रचंड हैराण झाले आहेत. अनेकांनी या समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा या नियोजन शून्य ग्रामपंचायतीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अंकुश तांडेल यांनी केली आहे.याबाबत आपण महाराष्ट्र शासनाकडे पाठपूरावाही करणार असल्याचे अंकुश तांडेल यांनी सांगितले.
https://prajasattakjanata.page/Y03_k2.html
0 टिप्पण्या