आशिष शेलार आणि शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
मुंबई
'भाजपमध्ये गेलेले नेते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार' या चर्चेमुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाहीतर पडद्याआड भाजप आमदारांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना भाजपचे आमदार आशिष शेलार थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला आले आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज 11 ऑगस्ट रोजी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलारांसोबतचा फोटो शेअर करून या भेटीची माहिती दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आज अचानक आशिष शेलार यांनी शरद पवार यांची भेट का घेतली. त्याचबरोबर शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कशासाठी भेट झाली याचा तपशील मात्र कळू शकला नाही. या भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपमध्ये निवडणुकी आधी गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच घरवापसी करतील असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे 'जे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहे ते पदरी काहीच न पडल्यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन नाराज झालेल्या नेत्यांची यादी मोठी असून ते आता राष्ट्रवादीमध्ये पुन्हा येण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. तसेच, 'जे राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये गेले आहे, त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय अद्याप घेतला नाही. लवकरच याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि याची माहिती सार्वजनिक केली जाईल, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, नवाब मलिक यांच्या दावाच्या खंडन केलं. 'भाजप आमदार इतर पक्षाच्या संपर्कात असल्याचं सांगणे म्हणजे मनात मांडे खाण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील आमदार फुटू नये म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे' असं प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. तसंच, 'महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही सरकार वैगेरे अस्थिर करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही' असंही पाटील यांनी स्पष्ट केले होते.
या सगळ्या घडामोडीमध्ये आता आशिष शेलार पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे.
0 टिप्पण्या