लॉकडाऊन उठलं नाहीतर 10 ऑगष्टनंतर कधीही रस्त्यावर उतरू - प्रकाश आंबेडकर
पुणे
आम्हाला कायदा मोडण्यासाठी मजबूर करू नका? लॉकडाऊन उठलं नाहीतर 10 ऑगष्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. कोरोनाचा एवढा बाऊ कशाला? कोरोना नसतानाही हॉटस्पॉटमध्ये अधिक मृत्यू झाले असतील तर मग तरीही कोरोना लॉकडाऊन का माथी मारलं जातंय? 2020 सालच्या तुलनेत 2019 ला अधिक माणसं दगावली. मग 5 टक्के गंभीर बाधितांसाठी 95 टक्क्यांना का वेठीस धरता? असा रोखठोक सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
शासन निर्णय कलेक्टरवर सोडणं हे चुकीचं आहे. मग शासन म्हणून सरकार नेमकं काय करतंय? एसटी मंहामंडळाची बस रस्त्यावर नेमकी कधी लावणार ते सांगा, अन्यथा 10 ऑगष्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरू आणि लॉकडाऊन तोडू, शासन काहीच पावलं उचलायला का तयार होत नाही आहे. या सरकारमध्ये निर्णय क्षमताच नाही तर राज्याचा आर्थिक गाडा नेमका कधी रुळावर येणार?, असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कोरोना हॉटस्पॉटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोविडचा परिणाम आहे का नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात ४,००७ मृत्यू झाले, यावर्षी मे महिन्यात १,६०५ मृत्यू झाले. मुंबईमध्ये मागच्यावर्षी ३,०४६ मृत्यू झाले, तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली. केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
लॉकडाऊनचे नियम मोठे गंमतीशीर आहेत. ते पहिले रद्द करा, माझा इशारा राज्य सरकारला आहे. केंद्रालाही नंतर देऊ असंही आंबेडकरांनी यावेळी सांगितलं. मुंबईत आज पावसानं दाणादाण उडवली आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शासनाने काही निर्णय लोकांवरही सोडावेत. तुम्ही शाळा सुरू करा, मुलांना पाठवायचं की नाही हे पालकांना ठरवू द्या. तसेच विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा या झाल्याच पाहिजेत, असं मतही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
0 टिप्पण्या