लाॅकडाऊन हा एकच पर्याय आहे का - मिलिंद पाटणकर
ठाणे
ठाण्यातील लाॅकडाऊन १९/७/२०२० पर्यंत वाढविल्याचे नुकतेच आयुक्तांनी घोषित केले. याबाबत लाॅकडाऊन हा एकच पर्याय आहे का असा सवाल नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी विचारला आहे. टाळेबंदीने घटनाक्रम पुढे ढकलतो नंतर रुग्ण येतच रहातात. रिक्षा, छोटे दुकानदार, लहान/मोठी हाॅटेल्स तेथे काम करणारे, घरोघरी काम करणारे यांची उत्पन्नाची साधने आपण किती दिवस बंद ठेवणार. टाळेबंदीमुळे समाजात मरगळ येते, कार्यक्षमता कमी होते तसेच नंतर प्रशासनामध्ये ढिसाळपणा व मनमानी वाढते या सर्व शक्यता विचारात घेतल्या आहेत का ? असा सवालही पाटणकरांनी आयुक्तांना केला आहे.
लाॅकडाऊनचा उपयोग नंतर कोरोना रुग्ण वाढणे कमी होण्यासाठी कसा करणार याची काहीच तयारी होतांना दिसत नाही. या काळाचा उपयोग सार्वजनिक शौचालये रोज दोनदा रात्री उशिरा किंवा सकाळी लौकर आणि दुपारी एकदा सॅनिटाइज करायची व्यवस्था करण्यासाठी केला का ? कारण रोग पसरण्याचे हे एक मुख्य ठिकाण आहे. तसेच छोट्या रस्यांवर चार चाकी ट्रॅफिक बंद करणे, हातगड्या, फेरीवाले यांची नीट व्यवस्था लावून दुकानांचा व हातगाडी, भाजीवाले यांचा व्यवहार मोकळा करणे. महापालिका कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये येथे फोनवरुन टोकन प्रथा सुरु करणे जेणेकरून ही कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु करता येतील कारण ती सुरु होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पाटणकर यांनी केले आहे.
प्रशासनालाच बंद करणे सोपे असते. टाळेबंदीमुळे रस्त्यावर बसणारे भाजीवाले फळवाले इतर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत कारण त्यांचे रोजचे रोजगार बंद झाले. हे रस्ते मोकळे करण्याची समस्या नंतर प्रशासनाच्या कर्मचार्यांची काम करण्याची क्षमता कमी झालेली असतांना कशी हाताळणार? रोजच्या गरजेच्या वस्तू भाजी, किराणा, अंडी, फिरणे, व्यायाम, छोट्या-मोठ्या कामानिमित्त बाहेर जाणे, आजारी मित्र नातेवाईक यांना भेटणे हे सर्व आवश्यक आहे. लोकांचं समाजजीवन संपत चाललंय आणि यामुळे मानसिक आजार बळावतील याची जबाबदारी कोण घेणार? २ जुलै लाॅकडाऊन नंतर रुग्णांचे आकडे बघितले (३\७-420, 408, 373, 268, 296, 410, 348, १०\७-416) तर हे काय दर्शवतात? लोकांना त्यांची स्वतःची काळजी त्यांनीच घ्यायला पाहीजे हे ठणकावून सांगा आणि लाॅकडाऊनचा पुर्नविचार करावा अशी विनती पाटणकर यांनी पत्राद्वारे केली आहे. .
0 टिप्पण्या