आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू
अकोला
सरकार सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवू शकणार नसेल तर लॉकडाऊन मोडावं लागेल. लॉकडाऊन सरकारने खुशाल लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू, अशारीतीने प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे. कोरोनासंदर्भातील आकडे साशंकता निर्माण करणारे आहेत, मृत्यूदर, रिकव्हरी रेट यांचे आकडे फसवे आहेत. हे गणित सरकारने समजून सांगावे. यातून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'आमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, फक्त आम्हाला लॉकडाऊन मोडावं लागेल,' असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
गुन्हे दाखल होण्याची भीती मला दाखवायची नाही, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी आहे. मी स्वतः कोविडची टेस्ट करून घेतली आहे, महाराष्ट्राचे 'मुख्यमंत्री यांना माझी मागणी आहे की, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करून घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांना शासनाने क्वारन्टाइन करावं, ज्यांची निगेटिव्ह आली त्यांना फिरायला रान मोकळं करावं, आमदार, खासदार, माजी आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची कोरोना चाचणी करण्याचा वटहुकूम मुख्यमंत्र्यांनी काढावा. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान याआधीही प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना मृत्यूदर कमी करण्याच्या केलेल्या दाव्यावर तिरकस टीका केली होती. असे दावे करून स्वत: 'खुदा' (देव) बनू नका, असं प्रकाश आंबेडकरांनी सुनावलं होतं. कोरोनाची भीती न बाळगण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिला होता. यासाठी त्यांनी यासंदर्भात भारतातील कोरोनासंदर्भात ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाचा दाखला दिला होता. ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील, अशी भीती आंबेडकरांनी काल व्यक्त केली होती.
0 टिप्पण्या