ठामपाच्या गलथान कारभाराविरोधात ठाणे मनसे अध्यक्षांचे ठिय्या आंदोलन
ठाणे
दररोज हजारोंच्या संख्येत रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णवाहिका मिळाली तर रुग्णालयात प्रवेश नाही, प्रवेश मिळाला तर खाट नाही, खाट मिळाली तर उपचार करायला डॉक्टर-परिचारिका नाहीत, असे भीषण चित्र आहे. परिणामी, करोनाबरोबरच हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग अशा गंभीर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हालांना पारावार राहिलेला नाही. कॊरॊनाचा प्रादुर्भाव रोखण्यात ठाणे महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे त्यांना वेळेत रुग्णवाहिका व अन्य सुविधा उपलब्ध होत नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढून रुग्णालये ओसंडून वाहत असताना उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसल्याने करोनाशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेलाच धाप लागली आहे. खाटांची मर्यादित संख्या, अपुरे डॉक्टर आणि परिचारिका अशा अशा अडचणीत करोना संकटाशी लढताना यंत्रणांचा दुबळेपणा उघड होत आहे. ठाण्यात दररोज सरासरी १०० रुग्ण आढळत आहेत. परंतु, महापालिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात जेमतेम ३५० ते ४०० खाटांची क्षमता असल्याने झोपडय़ा, चाळी, निम्नस्तरीय वस्त्यांधील रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांची टोलवाटोलवी सुरू आहे.शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील खाटांची संख्या ११५१ आहे तर एकूण रुग्ण १७००. त्यातच दररोज वाढती सरासरी १०० रुग्णांची वाढ होत आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील खासगी कोविड रुग्णालयात ७५० पेक्षा अधिक खाटा असल्या तरी ही रुग्णालयांमध्येही खाटा नसल्याचे चित्र आहे. सवलतीच्या दरात उपचारांसाठी राखीव असलेल्या खाटा भरल्याचे कारण देऊन येथे सर्वसामान्यांना दिवसाला चार ते सात हजार रुपयांच्या शुल्क आकारणीचे उपचार ‘पॅकेज’ पुढे केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हजार आणि दोन हजार खाटांच्या कोविड रुग्णालयाची गरज आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.
0 टिप्पण्या