खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज द्यावे, महाराष्ट्र सरकारची आरबीआयला विनंती
मुंबई
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानता खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज द्यावे, अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय झाला. . सह्याद्री अतिथिगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २७ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
कोविड १९ साथीच्या प्रादुर्भावामुळे वस्तू व सेवा कर कायद्यातील काही तरतुदींचे विहित मुदतीत कायदेशीर पालन करणे व्यापारी व कर प्रशासनास अवघड झाले असल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ यामध्ये '१६८ अ' हे कलम नव्याने समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. राज्य सध्या करोनाशी लढत असून त्याअनुशंगाने राज्यात ज्या वेगवेगळ्या समस्या उद्भवल्या आहेत त्या केंद्रस्थानी ठेवून सरकारने संबंधित घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात राज्यपालांच्या मान्यतेने अध्यादेश काढला जाईल. सदरहू '१६८ अ' हे कलम केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये ३१ मार्च २०२० रोजीच दाखल करून घेण्यात आले आहे. यानुसार कुठल्याही आपत्तीत जसे की युद्ध, साथ रोग, पूर, दुष्काळ, आग, वादळ, भूकंप यामध्ये सरकार विविध कर भरणा व इतर सेवांच्या बाबतीत निश्चित केलेल्या वेळेची मुदत वाढवू शकते.
हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई भांडार मोठ्या प्रमाणावर बंद असल्याने बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाली असून दुधाची विक्री १७ लाख लिटरने कमी झाली आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून २ महिन्यांकरिता ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर दूध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी १२७ कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधीद्वारे खर्च करण्यात येईल. अतिरिक्त दूध भुकटी व लोणी एनसीडीएफआयच्या ई पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यास आणि त्यासाठी सेवा शुल्कापोटी ०.३% खर्चास देखील मान्यता देण्यात आली. ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांच्यामार्फत राबविली जाईल. शासन आणि सहकारी संथा यांच्याकडून दूध संकलित केले जाईल. अतिरिक्त दुधाचे रूपांतरण करण्यासाठी दूध भुकटी प्रकल्पांना पॅकिंग व जीएसटीसह २५ रुपये प्रती किलो व लोण्याच्या पॅकिंगसाठी १५ रुपये असा दर देण्यात येईल.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोविडच्या आजारामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेवर होऊ शकणार नाहीत आणि त्यामुळे सभासद क्रियाशील वर्गवारीत न आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागेल. निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात शासन आदेश व अधिनियमात सुसूत्रता आणणे, लेखा परीक्षण विहित वेळेत करणे शक्य नसणे, यासाठी विविध पोटकलमांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
0 टिप्पण्या