सध्या देशात युद्धजन्य परिस्थितीचे वारे वहात आहेत. भविष्यात काही परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्याकरिता कौशल्य विभाग आणि अनिरुद्धज अकादमी यांच्या मदतीने राज्यातील हजारो आयटीआयमधील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहेत. आज ८ मे रोजी कोपरी येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत याची सुरूवात करण्यात आली. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचं स्वरूप ही त्यानुसार बदललं असून बचावाचं प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा उद्देश तसेच कोणत्याही आपत्ती व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावं म्हणून ही प्रशिक्षणाची गरज असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
कोणत्याही अवघड परिस्थितीला सामोरे जाताना, विद्यार्थी त्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. आपल्या कुटुंबासोबत इतर नागरिकांना मदत पोहचवणे आणि आपत्ती आल्यास मदत करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत करून नागरिकांचे प्राण वाचवू शकतात, असा आत्मविश्वास त्यांच्यात असतो. त्यामुळं आताच्या देशात सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत देखील त्यांच्याकडून चांगली मदत होऊ शकते. सोबत याचा उपयोग शाळा, महाविद्यालयात देखील होऊ शकतो, म्हणून हे प्रशिक्षण महत्वाचं असल्याचं लोढा म्हणाले.या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयटीआयच्या सहा नव्या अभ्यासक्रमाची घोषणा केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI, ईव्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमाचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे. दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचं विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन लाभलं. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली.
0 टिप्पण्या