अनेक सहा डिसेंबर आले आणि गेले. बाबासाहेबांची प्रचंड संख्येने गोरगरीब जनता या चैत्यभूमीवर यायची. पण अपुऱ्या जागेमुळे मग शिवाजी पार्कात, दादर रेल्वे स्टेशनवर, राजगृह परिसरात तर आंबेडकर काॅलेजमध्ये ही बाबासाहेबांची जनता आपलं बस्तान बसवायची. आंबेडकरी नेतेही जिथे मिळेल त्या जागी स्टेज बांधून आपआपल्या सभा उरकायचे. हे असे जवळ, जवळ ४६ वर्ष चालू होते. याबाबत काही करता येईल का, असे कोणालाही वाटत नव्हते. एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनाला गोरगरीब जनतेची होणारी कुचंबणा तशीच चालू होती. पण भारतीय डाक विभागात काम करणाऱ्या एका काॅमन मॅनने ही कोंडी फोडायचा दृढनिश्चय केला. सर्व्हिसमध्ये असूनही त्याने ही जोखीम स्विकारली. २००३ मध्ये त्याने बंद असलेल्या इंदू मिलची अकरा एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला मिळावी, अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारला पाठवले. आणि मग सुरू झाली एक न संपणारी प्रदीर्घ झुंज.
सतत पंधरा वर्ष या पठ्ठ्याने पत्रव्यवहार करुन केंद्र सरकारला अक्षरशः भंडावून सोडले. आणि मग शासकीय यंत्रणा हलू लागली. या एवढ्या मोठ्या जागेचं प्रचंड बाजार मुल्य कोण देणार? असा प्रश्न जेंव्हा उपस्थित झाला तेंव्हा पाठीशी कुठली संघटना, कुठलाही राजकीय पक्ष नसताना या काॅमनमॅनने केंद्र सरकारला पत्राद्वारे बेधडक सांगून टाकले की, तुम्ही फक्त किंमत सांगा. तेवढी रक्कम मी देतो. अर्थात त्याला बाबासाहेबांच्या जनतेवर प्रचंड विश्वास होता व आहे. याच विश्वासाच्या बळावर त्याने केंद्र सरकारला हा शब्द दिला होता. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एक, एक रुपया जरी घेतला तरी आंबेडकरी जनतेने अब्जावधी रुपये क्षणार्धात शासनाच्या झोळीत टाकले असते. त्यानंतरही पाच वर्षे म्हणजे अगदी २०२३ पर्यंत हा माणूस या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करीत आहे. याकरिता त्याने सात मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत १.शासकीय देखरेखीखालीच स्मारकाचे काम झाले पाहिजे.२. ४६५ फुट उंचीचा राष्ट्रीय ध्वज स्मारक परिसरात असला पाहिजे.
३. संविधानाच्या प्रास्ताविकेचं भव्य प्रदर्शन स्मारकात असायला हवे.
४. राष्ट्रीय प्रतिक असलेली शाही मोहोरची स्थापना स्मारकात असायला हवी.
५. स्मारकात अविरत जाणारी भव्य अशी भीमज्योत तेथे असायला हवी.
६. स्मारकात भारतरत्नाची प्रदर्शनी हवी.
७. स्मारकात भव्यदिव्य असे माता रमाईंचे व सविता माईंचे तैलचित्र हवे.
म्हणजेच गेली वीस वर्षे एकाकीपणे इंदू मिल स्मारकाचा लढा लढणाऱ्या या माणसाला, जेंव्हा प्रधानमंत्र्याच्या हस्ते या स्मारकाचे भूमीपूजन झाले तेंव्हा पध्दतशीरपणे डावलले गेले. साधं निमंत्रणही या माणसाला कोणी दिले नाही. पण मानपानाला भिक न घालता आजही हा माणूस लढतोच आहे. या एकांड्या शिलेदाराचं नाव आहे चंद्रकांत भंडारे गुरुजी. आज ७ मे ला ते ७३ वर्षांत पदार्पण करत आहेत. हे स्मारक झाल्याशिवाय मी मरत नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहिन, असा प्रणच भंडारे गुरुजींनी केलेला आहे. भंडारे गुरुजींच्या या जन्मदिनानिमित्त उठाव साहित्य मंचाकडून त्यांना आभाळभर सदिच्छा!
विवेक मोरे- अध्यक्ष: उठाव साहित्य मंच
0 टिप्पण्या