मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे दिनांक ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. नाल्यातून गाळ काढण्याची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत नाल्यातून काढलेल्या गाळाची ४८ तासात क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावावी, असेही निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. मुंबईतील नालेसफाई कामाच्या पाहणीस उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज (दिनांक २३ मे २०२५) सुरूवात केली. भांडुप येथील उषा नगर, उषानगर संकुल, नेहरूनगर नाला (वडाळा), धारावी टी जंक्शन जवळील नालेसफाईची त्यांनी पाहणी केली.
माजी आमदार तथा श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष . सदा सरवणकर, आमदार. तुकाराम काते, माजी खासदार. राहुल शेवाळे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव. नवीन सोना, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). अभिजीत बांगर, उप आयुक्त (परिमंडळ ५) देविदास क्षीरसागर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोष धोंडे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या). श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते., दौऱ्यात ठिकठिकाणी पाहणीवेळी, मुंबई महानगरात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांना उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यंदा पाऊस वेळेआधीच सुरू झाला आहे. तरीही नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. आतापर्यंत मोठ्या नाल्यांची ८५ टक्के तर छोट्या नाल्यांची ६५ टक्केपर्यंत सफाई पूर्ण झाली आहे. अजूनही १५ दिवस हातात आहेत. त्यामुळे नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने नालेसफाई सुरू आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्टखालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. महानगरपालिकेने दरवर्षी सखल भागात पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून ४२२ ठिकाणी उदंचन संच (पंप) लावले आहेत. तर २ ठिकाणी साठवण टाक्या आणि १० ठिकाणी लघू उदंचन केंद्र कार्यान्वित केले असल्याचे. शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री. शिंदे यांनी विक्रोळी येथील सूर्या नगर या दरड प्रवण क्षेत्राला भेट देऊन येथे महानगरपालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले. दरवर्षी याठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. दादर येथील महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट देऊन हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका आणि तिथे केलेल्या इतर कामांचाही त्यांनी आढावा घेतला.
0 टिप्पण्या