डलास ईकॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात देशभरातील गुंतवणूकदारांनी मोठा आवाज उठवला असून, दिल्लीतील जंतर मंतर येथे 2 मे 2025 रोजी एक दिवसीय शांततेत आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या आंदोलनात सुमारे 500 पीडित गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत विशाल स्वैन, विनोद राठोड, अभिषेक धुर्वे, मोनिका चौधरी आणि गुरविंदर सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या कंपनीने देशभरात 950 हून अधिक बनावट फ्रँचायझी विकल्याचा आरोप केला. कंपनीने ईकॉम डिलिव्हरीच्या नावाखाली राज्य, विभागीय, जिल्हा आणि पिन कोड स्तरावर बनावट फ्रँचायझी तयार करून लोकांकडून ₹1.5 लाख ते ₹32.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करून घेतली. परंतु त्यानंतर कंपनीची कार्यालये अचानक बंद झाली आणि सर्व संपर्क माध्यमे निष्क्रिय करण्यात आली.
विनोद राठोड यांनी सांगितले की, हा एक मोठा संगठित आर्थिक गुन्हा असून यामध्ये 20-22 लोक सहभागी आहेत. देशभरातील सुमारे 1400-1500 गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे आणि एकूण घोटाळ्याची रक्कम 3000 कोटींवर पोहोचली आहे. यापूर्वी देखील या कोअर टीमने ‘रोडक्स’ आणि ‘जस्ट डिलिव्हरी’ अशा कंपन्यांच्या माध्यमातून अशाच प्रकारचे घोटाळे केल्याचे उघड झाले आहे. विशाल स्वैन म्हणाले, "आम्ही फक्त बळी नाही आहोत, तर राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घोटाळ्याचे व्हिसलब्लोअर आहोत." मोनिका चौधरी म्हणाल्या, "आम्ही आमचे कष्टाचे पैसे गुंतवले होते. आता आम्ही केवळ आमच्यासाठी नाही, तर देशातील इतरांचे रक्षण करण्यासाठीही लढतो आहोत."पीडितांनी सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी, बँक खात्यांचे फॉरेन्सिक ऑडिट, आरोपींची अटक, जप्तीची कारवाई आणि भरपाई व्यवस्था यासह विविध मागण्या केल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, हे सर्व व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे तपास यंत्रणांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी कर ऍड विनोद राठोड यांनी केली आहे.
0 टिप्पण्या