पत्रकारितेचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यापेक्षा इथली व्यवस्था पत्रकारितेचा गळा घोटण्याचे काम करत आहे पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, समस्या आणि घडामोडी लोकांपर्यंत पोहोचतात. मात्र या एकूणच पत्रकारितेला आता घरघर लागली आहे. आधीच इथल्या व्यवस्थेने पत्रकारिता खिळखिळी करून टाकली असतानाच काही ठराविक पत्रकार जे आपली निर्भीड पत्रकारिता जोपासत आहेत त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम सरकार करीत आहे. अलीकडेच लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनी जयकुमार गोरे यांच्याबाबत दिलेल्या बातम्यांची शहनिशा न करता शासनाने त्यांनाच तुरुंगात टाकण्याचा महाभयंकर प्रकार केला आहे. खरे तर या प्रकरणी सरकारने निष्पक्ष चौकशी करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, याबाबत सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे
पत्रकारांना अटक करून समस्या सुटणार नाही. आपण लोकशाही देशात राहतो आहोत, आणि कोणत्याही पत्रकारावर अन्याय होऊ नये, असे राजाराम खरात म्हणाले. जर तुषार खरात यांनी काही चूक केली असेल, तर त्यांना योग्य शिक्षा मिळावी, परंतु त्यांच्या बाजूनेही न्याय होणे गरजेचे आहे. गोरे यांच्या संदर्भात त्यांनी जे सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची सरकारने निष्पक्ष चौकशी करून योग्य निष्कर्ष काढावा, असे मत रिपब्लिकन नेते राजाराम खरात यांनी व्यक्त केले.
तुषार खरात यांच्या अटकेमुळे लोकशाहीत पत्रकारांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. पत्रकार हे लोकशाहीचा एक मजबूत आधारस्तंभ असून, सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणे त्यांचे कर्तव्य आहे. गोरे यांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्याचे कार्य तुषार खरात यांनी केले आहे, यासाठी त्यांच्या भूमिकेची योग्य दखल घेतली पाहिजे, असे राजाराम खरात यांनी नमूद केले. आंदोलन करणाऱ्यांचा हेतू लोकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवणे हा असतो. मात्र, पोलिसांकडून आंदोलन करणाऱ्यांना अडथळे निर्माण करणे, त्यांच्या मोबाईल नंबर आणि नावे विचारणे हे दडपशाहीचे लक्षण आहे, असे खरात म्हणाले. अशा परिस्थितीत पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या एकतेमुळेच समाजात न्याय आणि सत्याचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.
आजच्या परिस्थितीत पत्रकार परिषद घेण्यासाठी देखील आर्थिक अडचणी येऊ शकतात. मात्र, मित्रमंडळीत वकील असतील, तर त्यांच्या मदतीने योग्य कायदेशीर पाऊल उचलता येईल. या प्रश्नावर विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत राजाराम खरात यांनी व्यक्त केले.
1 टिप्पण्या
सत्य परिस्थिती जनतेला सांगितली म्हणून पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकविले. त्यामुळे सत्य खोटे ठरणार नाही.उलट पोलिस ही दहशती खाली कारवाई करतात. हे जनतेच्या लक्ष्यात स्पष्ट आले आहे. आता जनता व पत्रकार यांनी या विरोधात सनदशिर मार्गाने पत्रव्यवहार करून रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे. अन्यता आज तुषार खरात आहे उद्या आपला ही नंबर येऊ शकतो.काही मतदार संघात आमदारांची लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर गुंडगिरी करणारा नेता म्हणुनच दहशत निर्माण झाली आहे. प्रथम पोलिस प्रशासन काहीच करतांना दिसत नाही म्हणूनच ही दहशत वाढत चालली आहे. पोलिसांनी निर्भय निर्भीड निःपक्ष काम केले तर, अशी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.
उत्तर द्याहटवा