सीमेवरील सीमा सुरक्षा बलाच्या जवानांच्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या संगीत स्पर्धेची उपांत्या फेरी ४ मार्च रोजी आणि अंतिम फेरी ५ मार्च रोजी मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहामध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये सीमेवरील १३४ जवान आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. राजस्थानमधील जोधपूर, पोखरण, जैसलमेर, ब्रह्मसर, रामगढ, बबलियनवाला, खाजूवाला, सांचू आणि बिकानेर या सीमांवरील जवानांसाठी सलामी हा करमणुकीचा खास कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. त्यावेळी प्रशांत काशीद यांनी केलेल्या सुचनेनुसार जवान आणि अधिकारी यांच्यासाठी व्हॉइस ऑफ बीएसएफ ही राष्ट्रीय स्तरावरील गाण्याची स्पर्धा सुरू करण्यात आली. नितीन नांदगावकर यांची निमना फाऊंडेशन, माधुरी नारकर यांच्या स्वर्णस्वर एंटरटेनमेन्ट, प्रि. अजय कौल यांचा एकता मंच आणि अविराज पवार यांच्य शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
४५ कलावंत आणि तंत्रज्ञांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक संतोष परब यांनी दिली. २०१५ पासून सातत्याने संतोष परब सैनिकांसाठी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करत असून खास सैनिकांसाठी गाण्याची स्पर्धा त्यांनी प्रथमच आयोजित केली आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात आला. या स्पर्धेमध्ये १३४ जवानांनी आणि त्यांच्या अधिका-यांनी भाग घेतला आहे. उपांत्य फेरीसाठी येणा-या जवानांपैकी अनेक जवान प्रथमच मुंबईमध्ये येणार आहेत. ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजल्यापासून या स्पर्धेची उपांत्य फेरी सुरू होणार असून अंतिम फेरी ५ मार्च रोजी रंगणार आहे. प्रशांत काशीद यांची संकल्पना असून नियोजन संतोष परब यांचे आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीतकार श्रीरंग आरस, मनोहर गोलांबरे, मालिका दिग्दर्शक विवेक देशपांडे, गायिका माधुरी नारकर, प्रदीप कडू, संजयराज गौरीनंदन हे काम पाहणार आहेत. विजेत्या जवानांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार असून विजेत्यास टिव्हीएस कंपनीकडून बाईक प्रदान करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या