वाराणसीमधील गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवल्यानंतर आता लखनऊच्या मंदिरातूनही साईबाबांची मूर्ती हटवण्याची मागणी होत आहे. याबाबत अखिल भारतीय हिंदू महासभेने सनातन धर्मियांना हिंदू मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवण्याचं आवाहन केलं आहे. बुधवारी एका हिंदू संघटनेच्या सदस्यांनी कैसरबाग येथील मंदिर गाठून साईबाबांची मूर्ती हटवण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या सदस्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याला साईबाबांची मूर्ती हटवण्याचं आवाहन केलं होतं.
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले की, शंकराचार्याजींनी सांगितलेलं, की फकीरांचा पुतळा आमच्या देवतांच्या शेजारी बसवता येणार नाही. ते साईबाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. बॉलीवूडचा पैसा वापरुन शिर्डीच्या साईबाबांवर एक गाणं बनवण्यात आलं असून, हा प्रोपागेंडा पसरवण्यात आला आहे. याबाबत शिशिर चतुर्वेदी यांनी देशभरातील सर्व सनातन धर्मियांना आवाहन केलं की, त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याला त्यांच्या जवळच्या मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याची विनंती करावी. चतुर्वेदी यांनी असंही सांगितलं, की साई ट्रस्टने राम जन्मभूमीसाठी पाठिंबा देण्यास नकार दिला होता. साई मुस्लिम आहेत, त्यांचा रामजन्मभूमी आणि प्रभू राम यांच्याशी काहीही संबंध नाही, असं ट्रस्टकडून सांगण्यात आल्याचं ते म्हणाले.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की मंदिरांमध्ये केवळ धर्मग्रंथातील देवताच हव्यात. काही कारणास्तव अशास्त्रीय मूर्ती मंदिरात असतील, तर अशा अशास्त्रीय मूर्ती मंदिरातून काढून टाकाव्यात. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साई बाबांबद्दल बोलताना सांगितलं, की साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण ते देव असू शकत नाहीत. त्याशिवाय धर्मगुरू अनिरुद्धाचार्य महाराजांनी सांगितलं, की संतांना संत म्हटलं जातं. पण मुस्लिमांमध्ये फकीर हा शब्द वापरला जातो. साईबाबा हिंदू नाहीत, त्यांच्यासाठी मुस्लिम शब्द वापरला जात आहे, ते मुस्लिम आहेत.
0 टिप्पण्या