नोव्हेंबर २०११ पासून बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. येत्या काळात बेस्ट उपक्रम शिल्लक राहणार किंवा नाही, अशी स्थिती समोर आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाशी संबंधित "क" अर्थसंकल्पाचे विलिनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या "अ" अर्थसंकल्पात तातडीने करावे. तसेच ) सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युइटी ११ जून, २०१९ च्या कराराप्रमाणे तातडीने त्यांना प्रदान करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकरिता आज ३ जूलै रोजी बेस्ट कर्मचारी मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.
दिनांक ११ जून, २०१९ रोजी बेस्ट वर्कर्स युनियन सोबत झालेल्या कराराचे पालन करून बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीचा ३३३७ बसगाड्यांचा बसताफा राखण्यासाठी, म्हणजेच आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्वरित बेस्ट उपक्रमाला मंजूर करावा. बेस्ट कामगारांचे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी व महापालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला वेतनकरार, पदोन्नती, रिक्त जागा, अंतिम देयके, कोविड भत्ता, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचे आदेश महाव्यवस्थापक यांना देण्यात यावेत. अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून बेस्ट कर्मचारी मुंबईकर जनतेला अविरत सेवा देत आहेत. ऊन असो, पाऊस असो की नैसर्गिक आपत्ती असो, बेस्ट कर्मचारी आपले कर्तव्य सातत्याने पार पाडत आले आहेत. नुकत्याच येऊन गेलेल्या कोविड १९ च्या कठीण काळातसुद्धा बेस्ट कर्मचाऱ्यांनी २४ x ७ न डगमगता अविरत सेवा दिलेली असून, यापायी २०० हून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांनी या महामारीत जीव गमवला असून, पर्यायाने त्यांच्या कुटुंबातील सुद्धा अनेक व्यक्तींना मृत्युला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात असे निवेदन शासनाला देण्यात आले.
0 टिप्पण्या