बालमोहन विद्यामंदिरच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली स्कूल बससेवा बेस्ट प्रशासनाने कोरोना काळात बंद केली ती अद्यापपर्यंत बंदच आहे. बेस्टने शालेय विद्यार्थ्यांसाठी मासिक रूपये २०० या माफक सवलतीच्या दरात सुरू असलेली स्कूल बस सेवा बंद केल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेत वाढ झाली.याचाच फायदा घेऊन खासगी स्कूल बस मालकांनी बसभाडे रूपये १५००/- केले तसेच पालकांनी आपली सेवा मध्येच सोडून जाऊ नये यासाठी पालकांकडून मासिक रूपये १५००/- याप्रमाणे वार्षिक रूपये १८०००/- इतके बस भाडे उकळू लागले.काही पालकांची तर दोन मुले या शाळेत शिकत असल्याने या अवाजवी बसभाडेवाडीमुळे असंख्य पालकांचे आर्थिक गणितच बिघडू लागले.
यातील अनेक पालकांनी याची कैफियत विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी सदैव झटणा-या बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती कडे आपली कैफियत मांडली तसेच बेस्टची ही स्कूल बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.त्याप्रमाणे बालमोहन शाळेत ज्या विभागातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात त्या विभागातील मिळून ३ खासदार,४ आमदार व १२ नगरसेवक यांना पत्र लिहून सन २०२१ पासून याचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत.यातील काही खासदार, आमदार व नगरसेवक यांनी बेस्ट प्रशासनाशी पत्रव्यव्हारही केला परंतु अपु-या बससंख्येचे कारण पुढे करत शाळेसाठी स्वतंत्र बससेवा पुरविण्यास आपली असमर्थता व्यक्त केली.गेल्या ३ वर्षाप्रमाणे यंदाही बालमोहन विद्यार्थी पालक समितीने वरील सर्वांशी पत्रव्यव्हार केला आणि बेस्ट प्रशासनाने यावेळीही अपु-या बस सख्येचं कारण पुढे करत असमर्थता व्यक्त केली.
परंतु यावेळी जागरूक तसेच जनसेवेसाठी तत्पर मा.नगरसेवक सचिन पडवळ यांनी वडाळा बेस्ट आगारात बेस्टचे मुख्य वाहतुक नियमन अधिकारी रवी शेट्टी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे वेगळी संकल्पना मांडली ती म्हणजे बेस्टची रेग्युलर प्रवासी बस विद्यार्थ्यांच्या ठरलेल्या सुरूवातीच्या बस थांब्यापूर्वी खाली करून या बसमध्ये केवळ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल व ही बस बालमोहन शाळेजवळील आस्वाद हाॅटेल जवळ रिकामी झाल्यानंतर पुढे प्रवासी वाहतुकीसाठी मार्गस्थ होईल. पडवळ यांनी ही संकल्पना बेस्टच्या अधिका-यांच्या गळी उतरविली. बेस्टचे मुख्य वाहतुक अधिकारी रवी शेट्टी यांनी भायखळा, काळाचौकी, शिवडी, वरळी आणि दादर या ठिकाणी शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटण्यापूर्वी बस थांब्यावर ८,९,आणि १० जुलै रोजी उभे राहून निरिक्षण करून रिपोर्ट देण्याचे आदेश आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. हीच संकल्पना गेली ३ वर्षे बेस्टच्या विविध अधिकाऱ्यांना समजावत होतो परंतु ती त्यांच्या गळी उतरत नव्हती परंतु सचिन पडवळ आपल्या प्रभावाने व वक्तृत्व शैलीने ही संकल्पना त्यांच्या गळी उतरविण्यात यशस्वी झाले आहेत. बेस्ट प्रशासनासोबत झालेल्या या बैठकीदरम्यान बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर देखील उपस्थित होते. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी पडवळ आणि पालक समितीच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने या स्कूल बस सेवा पुन्हा सुरू होण्याच्या पालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे साळसकर म्हणाले.
0 टिप्पण्या