मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आदी उत्सवांवरचे निर्बंध काढून टाकले. त्यामुळे हे उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यात आले. जनतेची नित्यगरजेची कामे हे सरकार करीत नसल्याची बोंब असली तरी सण आणि उत्सवांबाबत तसेच मंदिरांच्या जिर्णोद्धाराबाबत हे सरकार तत्पर असल्याचे दिसत आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे आता नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरकारने बार आणि दारूची दुकाने पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवून जनतेला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण 31 डिसेंबर रोजी मद्यपान करतात आणि नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्यासाठी पार्टी करतात. या काळात मद्याची मागणी असते. मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होतो. मद्य विक्रीमुळे राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे या वेळ वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक फायदा होणार आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये दारूचा महापूर येतो. दारूच्या पार्ट्या करून नव वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी राज्याच्या गृह विभागाने नाताळ सणासाठी 24, 25 आणि नववर्ष स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत बार आणि दारूची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, काही ठिकाणी वाईन शॉप, परदेशी आणि उंची मद्य विक्री करणारी दुकाने ही रात्री 1 वाजेपर्यंत खुली असणार आहेत. त्याशिवाय, पब, बार अॅण्ड रेस्टोरंट्स, बीअर बारदेखील पहाटे पाच वाजेपर्यंत खुली असणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या या परवानगीमुळे भारतीय जनतेची अर्थात मद्य प्रेमींची / तळीरामांची थर्टीफस्ट पार्टी दणक्यात साजरी होणार आहे.
0 टिप्पण्या