Top Post Ad

केंद्रात ३२ लाख सरकारी पदे रिक्त


 काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात  है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री CWC सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, गोवा, दिव व दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार मिलिंद देवरा, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्या संध्या सव्वालाखे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ नेते, पदाधिकारी व लाखो लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. 

आपल्या भाषणात राहूल गांधी म्हणाले...
देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे पास करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. संविधानाने महिला, गरिब, मागास समाजाला अधिकार दिले ते भाजपा देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो तर मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालतात. मोदी सरकारने देशावर २०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे पण कल्याणकारी योजनांवरील निधीमध्ये कपात केली जाते, मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. भाजपाला रोखले नाही तर देश बरबाद होईल, संविधान संपुष्टात येईल. 

मागील काही दिवसांपासून देशातील जातीय जनगणना करण्याला भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून जो काही विरोध केला जात आहे. त्या विरोधाला काहीही अर्थ नाही. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर जो जातीय जनगणना करणार. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून सातत्याने प्रचार करण्यात येतो की काँग्रेसने स्वातंत्र्यलढा फक्त त्यावेळच्या राजे-महाराजांसाठी लढला असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हांच्या राजे-महाराजे यांनी फक्त ब्रिटीशांशी युती केली. त्यांच्या स्वतःसाठी. परंतु काँग्रेसने ब्रिटीशांना हाकलून लावण्यासाठी जो स्वातंत्र्यलढा उभारला तो सर्वसामान्य लोकांसाठी होता असे सांगत या सर्वसामान्य जनतेसाठीच देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी संस्था सुरु केल्या.

केंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडिया, निवडणूक आयोग, न्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरी, तरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे. ओबीसी, दलित, मागासवर्गीयांना सत्तेत, प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली व देशात गरिब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल व देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार दे देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात व देशात परिवर्तन आणू .  

देशाला स्वातंत्र्य मिळाले ते फक्त काही नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर मिळाल्याचा प्रचार करण्यात येत आहे. तसेच काही लोक मोदी पंतप्रधान बनल्यानंतरच देशाचा विकास झाल्याचे सांगत आहेत. मात्र मागील ६०-७० वर्षात देशाचा जो काही विकास झाला तो येथील तरूणांमुळेच झाला. देशातील तंत्रज्ञानातील शोध, विविध विज्ञानातील शोध, संगणकाचा विकास हे येथील तरूणांनीच केले, असे असतानाही जाणीवपूर्वक काही जण मोदी आल्यानंतरच विकास झाल्याचे खोटा प्रचार करत आहेत. काँग्रेसच्या काळात काहीच विकास झाला नाही का. आम्ही न्याय योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत आर्थिक मागास असलेल्या लोकांच्या बँक खात्यात दरमहा ७ हजार रूपये देणार आहोत. कारण काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून देशातील बेरोजगारी आणि सर्वसामान्य जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी ही योजना राबविणार असल्याची गॅरंटीही देत असल्याचे सांगितले.



मल्लिकार्जून खर्गे म्हणाले ...
 राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणूकीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे जादूगार आहेत. तर मी चमत्कार घडविणारा असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीतही देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करणार, देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी वर्षाला २ कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देणार अशा घोषणा केल्या. पण सर्व देशवासियांच्या खात्यात आले का १५ लाख रूपये, देशातील बेरोजगारी कमी झाली का असे खोटे बोलणारा व्यक्ती पंतप्रधान पदी बसला.  भाजपावाले नेहमी देशाच्या सुरक्षेचा आणि लोकशाहीचा मुद्दा पुढे करतात. परंतु त्यांच्याकडून साधी संसदेची सुरक्षा करता आली नाही. वाढत्या बेरोजगारीमुळे देशातील दोन तरूण संसदेत घुसले आणि त्यांनी धूर पसरविला. या प्रश्नाचे उत्तर संसदेत देता आले नाही. एकाने प्रश्न विचारला म्हणून निलंबित केले. तर त्याच्या लोकशाहीच्या संरक्षण हक्कासाठी बाकीचे १४० खासदार पुढे आले तर त्यांनाही निलंबित केले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकशाहीनुसार संसदेत उत्तर न देता इकडे तिकडे जाऊन बोलतात मात्र संसदेत उत्तर देत नाहीत. हे कसली लोकशाही भाषा करतात. २०२४ साली होणाऱ्या निवडणूकीत जर लोकशाही वाचविण्यासाठी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी न केल्यास हे सगळंच बंद होईल. तसेच देशातील लोकशाही आणि सरकारी यंत्रणा आणि तुम्हा-आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य टीकवायचे असेल तर भाजपाला पराभूत करणे गरजेचे आहे. त्यानंतर भाजपा कधीच दिसणार नाही. अन्यथा देशात पुन्हा कधीच निवडणूका होणार नाहीत.  हे समोर जे काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसत आहेत. ते तर मजूर आहेत. त्यांना जे सांगितले जाते तेच काम ते करतात. परंतु त्यांच्या मागे बसून जे सांगतात त्या कार्पोरेट कंपन्या आहेत. त्या कंपन्या कोण आहेत. त्यांना पहायला पाहिजे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा असलेल्या भूमीत काँग्रेस स्थापना दिन साजरा होत आहे याचे स्वागत आहे. महात्मा गांधी यांनी याच नागपुरातून हुकूमशाही सत्तेच्या विरोधात नारा दिला व संपूर्ण देशातून जनता एकवटली आणि १५० वर्षांची ब्रिटिशांची हुकूमशाही राजवट संपुष्टात आणली. नागपुरातून याच भूमितून इंदिराजी गांधी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा ठराव केला होता. भारताच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असून मल्लिकार्जून खरगे व राहुलजी गांधी यांचा संदेश देशात जावा यासाठी ही सभा महत्वाची आहे. हुकूमशाही सत्तेला बाहेर हाकलण्यासाठी, कामगार, शेतकरी, तरुणांना न्याय देण्यासाठी, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी है तैयार हम, हा संदेश या सभेतून दिला आहे. इंदिराजी गांधी यांनी देशात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणली, देशाचा विकास केला. इंदिराजी गांधी यांनी त्यावेळी नागपुरात सभा घेतली व विदर्भातील जनतेने लोकसभेच्या ११ पैकी ११ जागा विजय मिळून दिला व इंदिराजी पंतप्रधान झाल्या. आज इंदिराजी यांचे नातू राहुलजी गांधी मोहब्बत का संदेश घेऊन आले आहेत, त्यांनाही विदर्भ व महाराष्ट्राने तशीच साथ द्यावी, 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की,
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने बलिदान दिले आहे, हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही तरी जनतेचा पाठिंबा मात्र वाढला आहे. देशासमोर आज मोठी संकटे उभी आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला अत्याचार या विषयावर भाजपा सरकार बोलत नाहीत. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून धर्मांध शक्ती वेगळे मुद्दे पुढे करत आहे. काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेकांनी केला, काँग्रेस संपली नाही पण ते लोक मात्र संपले हे लक्षात ठेवा. राज्यात समाजा-समाजात वाद उभे केले आहेत, लोकांमध्ये भांडणे लावून सत्तेची पोळी भाजली जात आहे. जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणे ही काँग्रेसची भूमिका आहे पण भाजपा सरकार ते करत नाही. देशाची लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. देशाला व राज्याला मजबूत व स्थिर सरकार देण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com