शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी ठाकरे गटाकडून गद्दार..गद्दार अशी घोषणबाजी झाल्याने शिवतीर्थावर राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचीही माहिती समोर येत आहे. शिवतीर्थावर मोठा तणाव निर्माण झाल्याने मोठ्या संख्येने पोलीस शिवतीर्थावर दाखल झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले. शिंदे गटाचा कार्यक्रम झाल्याने त्यांनी शिवतीर्थावरुन बाहेर निघून जावे अशी मागणी ठाकरे गटाचे अनिल परब आणि अनिल देसाई यांनी केली. मात्र, शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथेच थांबल्याने दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला (दि.१६) दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळ येथे उपस्थित राहून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, विभागप्रमुख सौ. प्रिया गुरव- सरवणकर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. या दोन्हा गटात राडा झाला. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ घोषणाबाजी सुरू होती. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूला असलेला रॅक तुटला. या प्रकरणात ५० ते ६० अज्ञातांविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आयपीसी आणि बॉम्बे पोलिस ॲक्टनुसार या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार आहे, असे देखील शिवाजी पार्क पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हीअतिशय दुर्देवी आणि निंदनीय घटना आहे. उद्या स्मृतीस्थळादिनीनिमित्त काही वाद नकोत म्हणून आम्ही आजच स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांचे दर्शन घेतले. परंतु उ.बा.ठा गटाकडून तेथे येत राडा करण्यात आला हे चुकीचं आहे अशोभनीय आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मी सर्वांना शांततेच आवाहन करतो असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
ही दुर्देवी घटना आहे. जे गद्दार आहेत, घाबरलेले आहेत, जे गुवाहटीला आणि गुजरातला पळून गेले यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "आमच्यासाठी बाळासाहेबांचा स्मृतिदिन अत्यंत महत्वाचा दिवस आहे. शांततेने श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही इथे येत असतो. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणी स्मृतिदिनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते विघ्न येऊ देणार नाही. त्यांचं झालं आहे ना आता त्यांना निघू द्या. ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार माहिती आहेत, ते कुणीही इथे अनर्थ करणार नाहीत."
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अकरावा स्मृतिदिन. स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील त्यांचे चाहते शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्व मंडळीनी येत आदरांजली वाहिली. यावळे ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित होते.
भाजप आमदार राम कदम यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी एक्सवर एक पोस्ट करत मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. अनेक धाडसी निर्णय बाळासाहेबांनी ज्या बंगल्यात घेतले. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता. तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही? असा सवाल करत ही भावना प्रत्येक बाळासाहेबांना मानणाऱ्याची आहे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या