शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही घोटाळ्यांचे अनेक आरोप आहेत. असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी भोपाळ येथे भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले होते. मात्र यानंतर राष्ट्रवादीचा एक मोठा गट भाजपसोबत महाराष्ट्रातील सत्तेत सामिल झाल्याने यावर पडदा पडला असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रधानमंत्री जेव्हा एखादी गोष्ट जाहीरपणे बोलतात, त्यावेळी त्याची किमान चौकशी झाली पाहिजे, त्यावर कारवाई झाली पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या आरोपासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. पंतप्रधानांच्या वक्तव्याची नोंद झालेली असते. यंत्रणा त्याअनुषंगाने तपास करत असतात. कारवाई होत नसेल तर पंतप्रधानांनी खोटे आरोप केले असा अर्थ होतो. सरकारने दहा दिवसांत गुन्हा दाखल करावा, अन्यथा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांची माफी मागावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पंतप्रधानांचा खोटेपणा जनतेसमोर आणण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला निवडणुकपूर्व अंदाज!
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे आपला निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या ट्विटमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. 'द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या 'प्ले बुक' मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली - हे आणि असे बरेच काही निवडले जाईल आणि भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल.' असा घणाघाती आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त करताना केला आहे. ट्विच्या शेवटी त्यांनी भाजप-RSS ची योजना भारतीय प्रजासत्ताकला निवडणुकीतल्या फायद्यासाठी 'भयभीत प्रजासत्ताक' मध्ये रूपांतरित करण्याची असल्याचे म्हटले आहे. तसेच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
0 टिप्पण्या