पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्ह राज्यातील पत्रकारांच्या प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकार उद्या प्रत्येक शहरात निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करतील. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करतात. 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले, त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला.. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे. उद्या राज्यव्यापी आंदोलनाद्वारे याचा निषेध करण्यात येणार आहे. मुंबईत १७ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता हुतात्मा चौकात हे आंदोलन होईल.
तालुका आणि जिल्हास्तरावर कलेक्टर ऑफिस किंवा तहसिल कार्यालयासमोर किंवा शहरातील मध्यवर्ती चौकात हे आंदोलन करावे असे आवाहन संयुक्त कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.. मुंबईत हुतात्मा चौकात दुपारी 12 वाजता हे आंदोलन होईल.. हुतात्मा चौकातील या आंदोलनानंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल त्यांना माहिती देतील..
---------------------------------------------------
पुणे : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी दिलेल्या बातमीचा राग धरून शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना काही दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. त्यानंतर वृत्तांकन करून परतताना चार ते पाच जणांच्या टोळक्याने भर चौकात महाजन यांच्यावर हल्ला केला. पत्रकारावरील या हल्याचे पडसाद राज्यभर उमटत असुन राज्यभर विविध पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.
ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने या प्रकरणी जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्यांच्या मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व सदर दोषींना कडक शासन करण्यात यावे तसेच पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले आहेत त्यामुळे शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी ही मागणी ऑल इंडिया संपादक संघाच्या वतीने बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना दि.11 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी ऑल इंडिया संपादक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल कांबळे, पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष तुषार ओहोळ, पुणे जिल्हा महासचिव भीमसेन उबाळे, पुणे जिल्हा सचिव गौतम शिंदे, पुणे शहर उपाध्यक्ष प्रतीक चव्हाण, पुणे जिल्हा संघटक निलेश जाधव, बारामती तालुकाध्यक्ष दशरथ मांढरे, बारामती तालुका उपाध्यक्ष जितेंद्र जगताप तसेच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
ठाणे : ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर काळ्या फिती लावुन निषेध करण्यात आला. या हल्यामागील राजकिय व्यक्तींना तत्काळ अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या माध्यमातुन सरकारकडे करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी घोषणाबाजी करीत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली.
मुंबई : पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीकरिता शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील प्रमुख पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन किशोर पाटील यांच्यावर कारवाई करून संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.. या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, म्हाडा पत्रकार संघ, मुंबई महापालिका पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन, आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते...
0 टिप्पण्या