सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मातंग समाजाचा 20 जुलै रोजी पुणे ते मुंबई दवंडी मोर्चा...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्यायमंत्री यांनी २५ मार्च २०२३ रोजी सकल मातंग समाजाची बैठक घेवून एक महिन्याच्या आत मातंग समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज या घटनेला चार महिने झाले तरी सरकारने शब्द पाळला नसल्याने सरकारला दवंडी देऊन जागे करण्यासाठी सकल मातंग समाजाच्यावतीने १८ जुलै रोजी लहू तीर्थ पुणे ते मुंबई अशी दवंडी यात्रा काढण्यात येणार आहे. २० जुलै रोजी या दवंडी यात्रेचे आझाद मैदानावर महामोर्चात रूपांतर होणार आहे, अशी माहिती सकल मातंग समाजाचे नेते मारुती वाडेकर यांनी सायंकाळी 6 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. यावेळी त्यांच्या सोबत ऍड.राम चव्हाण,एस.एस.धुपे व बाबुराव मुखेडकर, रणधीर कांबळे,सुरेश साळवे,कैलास डाखोरे,शंकर कांबळे,रमेश रोकडे आदी उपस्थित होते.
या संदर्भात वाडेकर पुढे म्हणाले कि,१८ जुलै २०२३ सकाळी १० वा. क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारक संगमवाडी पुणे येथून दवंडी यात्रेचा प्रारंभ व रात्री खोपोली येथे मुक्काम होईल.१९ जुलै २०२३ सकाळी खोपोली वरून निघून ते सुमननगर चेंबुर येथे मुक्काम,२० जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वा. सुमननगर चेंबूर येथून दवंडी पदयात्रेस प्रारंभ होऊन सायंकाळी ४ वा आझाद मैदान, मुंबई येथे दवंडी यात्रा आंदोलन करील.
ऍड.राम चव्हाण यांनी म्हटले कि,अनुसूचित जाती आरक्षण वर्गिकरण हे अ-ब-क-ड नुसार व्हायला हवे.साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था (आर्टी) स्थापन करण्यात यावी. क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी तात्काळ करावी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा ९ वर्षांचा थकीत निधी देवून महामंडळ पुर्ण क्षमतेने चालू करावे आणि शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला संपूर्ण शासकीय मदत देवून कुटूंबाचे पुर्नवसन करावे या आमच्या प्रमुख मागण्या सरकार दरबारी धुळखात पडल्या असून यावर तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज आपली नाराजी तीव्रपणे जाहिर करील.
मारुती वाडेकर म्हणाले कि आम्ही राज्यभरात मोठ्या संख्येने आहोत. सरकार आमची जनगणना करीत नाही. आज मातंग समाजातील सुशिक्षित मुलामुलींच्या हाताला काम, राजगार नाही म्हणून बेकारी वाढली आहे.आम्ही राज्यातील 28 हजार 906 ग्राम पंचायती,तालुक्यातील पंचायत समित्या,जिल्हा परिषद आणि विविध मंडळे, विधानमंडळ आणि लोकसभा यात आमच्या समाजाला सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळावे याचसाठी आम्ही आज लढाईला सज्ज झालो आहोत. आम्ही निवडणूक जिंकू शकत नाही मात्र समोरचा उमेदवार पडायचे उपद्रव मूल्य आता आम्ही सिद्ध करण्यास निघालो आहोत असे म्हणत हलगी वाजवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समाजाची ताकद दाखवीण्यासाठी दवंडी दिली.
0 टिप्पण्या