भूमि अधिकार मोर्चा महाराष्ट्राच्या आंदोलनाला अनेक प्रागतिक पक्षांचा जाहीर पाठींबा
राज्यातील गायरान व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारक संघटना राज्यभर एकत्रीत येत असून "भूमि अधिकार मोर्चा महाराष्ट्र राज्य" या बॅनरखाली राज्यात वेगवेगळया ठिकाणी गायरान प्रश्नांवर धरणे-प्रदर्शने, स्थनिक मोर्चे काढल्यानंतर दिनांक १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान येथून विशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांनी दिली. या मोर्चाच्या आयोजनाबाबत मुंबईतील पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या मोर्चाला राज्यात प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांनी म्हणजे बी. आर. एस. पी. सी.पी.आय. सी.पी.आय. (एम.), शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, आर.पी.आय. (सेक्युलर), एकलब्ध सेना, लाल निशान पक्ष, बहुजन विकास आघाडी, सी.पी.आय. (एम.एल), सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी या पक्षांनी सक्रीय पाठींबा जाहीर केलेला असून पक्षकार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चात सामिल होणार आहेत व या पक्षाचे आमदार देखील या प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडणार आहेत तसेच या पक्षाचे नेतेही या मोर्चाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचेही ते म्हणाले.
देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून करोडो-लाखो गरीब लोक हे भूमिहिन असून इंग्रज सरकारने, हैद्राबाद नवाबाने सुध्दा गोरगरीब लोकांना सरकारी जमिनी, वतने, इनाम सोबतच दिलेल्या होत्या. त्याच लोकांना आज महाराष्ट्र सरकारने अतिक्रमणधारक ठरविले आहे. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जवळपास साडेपाच लाख कुटूंबे ही स्वतःच्या राहत्या घराच्या व वहिवाटी शेतीच्या मालकीपासून कोसो मिल दूर असल्यामुळे सध्या राज्यातील लाखो गोरगरीब भुमिहिनांना अतिक्रमणधारक ठरवून न्यायालय निर्णय नावाने बेदखल करून पुन्हा या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे सरकारी षडयंत्र सुरु असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष डॉ.सुरेश माने यांनी केला. त्याचबरोबर पहिल्यांदा धनदांडग्याची, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने हटवावीत, भूमिहिनांच्या घर व वहिवाटी शेतीहक्काचे संरक्षण करावे, गायरान, गावठाण, वनविभाग जमिनिवरील पिढयानपिढ्या वर्षानुवर्षे राहते घर व शेती करून पोट भरणान्या भुमिहिनांना जमीन वाटप व्हावे, त्या जमिनिचा सातबारा त्यांच्या नावे व्हावा या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा यशस्वी करावा असे आवाहनही माने यांनी यावेळी केले.
0 टिप्पण्या