महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन खारघर येथे 16 एप्रिल रोजी करण्यात आलं होतं. ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. यावेळी आप्पासाहेब यांचे लाखो अनुयायी कार्यक्रमाला आले होते. मात्र, हे लाखो अनुयायी खुल्या मैदानात होते. त्या दिवशी तापमान 42 डिग्री होते. त्यामुळे उष्माघाताने अनेकांचा बळी गेला. या प्रकरणी अॅड. नितीन सातपुते यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टाने आज दखल घेतली. त्यावर आता 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. आयोजकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी केली. या घटनेला आता दोन आठवडे झाले तरीही पोलिसांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही.
या याचिकेत गंभीर स्वरूपा मागण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा. हा गुन्हा भादवी 269, 270, 271, 302 आणि 304(2) या नुसार दाखल करण्यात यावा. त्याच प्रमाणे इतर सरकारी अधिकारी यांनाही आरोपी करण्यात यावे. 14 कोटी रुपये वसूल करण्यात यावे. आप्पासाहेब यांच्या कडून ही पुरस्काराची रक्कम काढून घेण्यात यावी. हे पैसे मयताच्या नातेवाईकांना वाटण्यात यावेत. 10 लाख लोक उन्हात तळपत होते. यावेळी राजकारणी एसी शामियानात मजा करत होते. चांगलचुंगलं खात होते. यामुळे राजकारणी आणि सरकारी अधिकारी हेच या या मृत्यूला जबाबदार आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अॅड. नितीन सातपुते यांनी केली आहे.
या जनहित याचिकेवर आज हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी अॅड. सातपुते यांनी ही जनहित याचिका किती महत्वाची आहे. याबाबत युक्तिवाद केला. तो मुख्य न्यायमूर्ती गंगापूरवाला यांनी मान्य केला आणि तुमची याचिका ऐकली जाईल. त्यावर 8 जून रोजी सुनावणी होईल, अस म्हणाले. त्यामुळे या याचिकेवर आता जून महिन्यात सुनावणी होणार आहे.
लोकांचा मृत्यू झाल्याने आयोजकांवर टीका केली जात आहे. याचे आयोजक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी आहेत. या कार्यक्रमाच्या भोंगळ नियोजनावर गेली 10 दिवस सतत टीका होत आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्य समितीची नेमणूक केली आहे. त्यानंतर आता हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहचल आहे. या प्रकरणात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका अॅड. नितीन सातपुते यांनी दाखल केली आहे.
------------------------------------------------
खारघर घटनेबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.हे आंदोलन उद्या घटनेच्याच ठिकाणी दिवसभर करण्यात येणार आहे. कडक ऊन आसल्याने उष्माघाताने मृत्यू झाला.याबाबत आम आदमी पक्षाने कारवाईची मागणी केली आहे.जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता त्यांनी आत्मक्लेश आंदोलन झेडल आहे. आप पक्षाचे सुमारे 200 कार्यकर्ते ज्या मैदानात कार्यक्रम झाला तिथेच उन्हात बसणार आहेत. आणि आत्मक्लेश करणार असल्याचे आप पक्षाचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी सांगितलं.
आम आदमी पक्षाने या प्रकरणात कोर्टात धाव घेतली आहे. पक्षाने फौजदारी संहिता 1973 नुसार कोर्टात कलम 156(3) नुसार अर्ज केला आहे.हा अर्ज स्थानिक पनवेल कोर्टात केला आहे. या अर्जात आयोजक यांच्यावर भादवी कलम 304,308 , 336 , 337,338 आणि 114 कारवाई करण्याचे पोलिसाना आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. या अर्जावर पनवेल कोर्टात लवकरच सुनावणी होणार असल्याच, आम आदमी पक्षाचे राज्याचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी सांगितलं.
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी जमलेल्या श्रीसदस्यांच्या समुदायातील काही अनुयायांचा उष्माघाताने मृत्यू ... किमान पाचशे लोक उष्माघाताने अत्यवस्थ ... या सर्वांवर कामोठे येथे एम जी एम तसेच नवी मुंबईतील टाटा रुग्णालय आणि डी वाय पाटील रुग्णालयात उपचार ... दरम्यान, सरकारी पातळीवरून याबाबत प्रचंड गोपनीयता ... विशेष म्हणजे उष्माघात आणि तापमानावर रोज बोलणारे अधिकारी आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाशी संबंध असलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी फोन उचलणे बंद केले... माहिती देणे बंद केले... . राज्यात उष्माघाताची लाट असतानाही हा कार्यक्रम भर दुपारी घेण्यात आला.
राजकीय गणिते लक्षात घेऊन आणि आप्पासाहेब यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या अनुयायांचा पुढील निवडणुकीत राजकीय फायदा करून घेण्यासाठी आयत्या श्रीसदस्यांचा समुदाय जमवण्याचे नियोजन होते. ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबईतील या श्रीसदस्यांचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला किमान तीस विधान सभा मतदारसंघात थेट फायदा होईल, असे म्हटले जाते
या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत देखील प्रारंभी अत्यंत ढिसाळपणा दिसून आला. एका सनदी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एवढा मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन असताना आणि हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाचा असताना सांस्कृतिक विभागातील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हात वर केले होते. हा आमचा कार्यक्रम असून मुख्यमंत्री कार्यालयाचा असल्याचे सांगून सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाच्या नियोजनाकडे पाठ फिरवली होती, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
कार्यक्रमासाठी लागणारा वीजपुरवठा मिळावा यासाठी साधा अर्ज देखील करण्यात आला नव्हता. मात्र महावितरणने स्वतःहून पुढाकार घेत वीज व्यवस्था उभारून दिली. आदल्या दिवशी रात्री येणारे श्री सदस्य, दुसऱ्या दिवशी जमणारे श्री सदस्य यांचे जेवण, आणि पाण्याची, शौचालयाची व्यवस्था करण्याबाबत अत्यंत ढिलाई सुरू होती. अखेर मुख्यमंत्री यांचे विश्वासू सचिन जोशी यांच्यावर नियोजनाबाबत आढावा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सचिन जोशी यांनी दोन दिवसापूर्वी सर्व अधिकाऱ्यांना बोलावून नियोजनाची मीटिंग घेतली होती. जोशी यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी रायगड जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, सिडको प्रशासन, पनवेल महानगरपालिका यांच्यावर सोपवून त्यांना कामाचे वाटप केले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर कामाला गती प्राप्त झाली होती.
असे असतानाही भर दुपारी कार्यक्रम झाल्यामुळे अनेक लोकांना उष्णतेमुळे भोवळ आली. त्यात काही अनुयायांचा मृत्यू झाले आहेत, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र नेमका आकडा किती याबाबत त्याने मौन बाळगले. दुर्घटनेतील मृतांचे खरे आकडे समोर आले तर त्याचे खापर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फुटण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पातळीवरून ही बातमी दाबण्याचे आणि कुठलेही आकडा बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते. एकही सनदी अधिकारी किंवा या कार्यक्रमाच्या नियोजनाशी संबंधित कुठलाही अधिकारी फोन घेण्यास तयार नाही आणि किंवा बोलण्यास तयार नाही. मृतांच्या आकड्यांबद्दल संधिग्दता आहे. किती मृत्यू झाले याबाबत कुठलीही नेमकी खातरजमा होऊ शकलेली नाही.
0 टिप्पण्या