ठाणे -पालघर जिल्ह्यात हजारो नोंदणीकृत सार्वजनिक संस्था, मंडळे आणि ट्रस्ट असून गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ या संस्थांची नोंदणी टेम्भी नाका येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात होत आहे. या कार्यालयात रोज शेकडो संस्था पदाधिकाऱ्यांची ये-जा होत असते तर येथील कर्मचाऱ्यांनाही अथकपणे त्यांना सेवा द्यावी लागत आहे. दोन-तीन मजल्यांमध्ये हे कार्यालय विभागलेली जागा अत्यंत अपुरी आणि कोंदट असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत असून त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.
तसेच येथे येणाऱ्या नागरिकांनाही सुविधांअभावी समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यांच्या तक्रारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून आमदार संजय केळकर यांनी गेली चार वर्षे सातत्याने केलेल्या पाठ पुराव्याला यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधी-न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार-चर्चा करून श्री राम मारुती मार्ग येथील वारकरी भवन असलेल्या भव्य इमारतीत न्यास नोंदणी कार्यालयाला भाडेपट्ट्याने जागा मिळवून दिली. तब्बल ६०९० चौरस फूट चटई क्षेत्र असलेली ही जागा सर्व सुविधांनी युक्त आहे. फर्निचर आणि साहित्यासाठी २६ लाख ५० हजार रुपयांचा निधीही मंजूर करवून घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अखेर छोट्या आणि कोंदट जागेतून भव्य इमारतीत हलणार आहे.
0 टिप्पण्या