Top Post Ad

महापुरुषांच्या बदनामीचा एककलमी कार्यक्रम



महापुरुषांची बदनामी आणि राजकारण हा विषय काही नवीन नाही. या विषयावरच इथलं राजकारण अधिक ढवळून निघतं. म्हणूनच हा विषय नेहमीच ज्वलंत ठेवला जातो. शासनाने जाहीर करूनही शिवजयंतीचा वाद कायम ठेवण्यामागे राजकारण्यांचा कोणता हेतू आहे हे काही सांगायला नको. महाराष्ट्र म्हणजे शिवराय आणि शिवराय म्हणजे महाराष्ट्र हे तर समिकरणच आहे. म्हणून कायमच शिवरायांच्या जयंतीचा वाद, त्यांना प्रशिक्षण देण्राया गुरुंचा वाद, त्यांच्या राज्याभिषेकाचा वाद असे अनेक वाद नेहमीच सुरु असतात. विस्मृतीत गेलेली शिवरायांची समाधी महात्मा जोतिरावांनी जेव्हा शोधून काढली तेव्हा लाथेने त्यांच्या समाधीवरची फुले उडवणाऱ्या आणि मला विचारल्याशिवाय इथे पुजा-अर्जा करायची नाही असे धमकावण्रायाबाबत कोणताही वाद निर्माण होत नाही.  

इतकच काय शिवरायांची जयंती सुरु करून पोवाड्याच्या रुपाने जनमानसात शिवरायांची महती सांगणाऱ्या जोतिरावांची चर्चा होत नाही. पण ऐन-केन प्रकारे पुरंदरेची चर्चा मात्र रंगली जाते.  गंगाधर टिळकांपासून ते आजपर्यंत सर्वांच्या डोळ्यात छत्रपती शिवराय खुपत आहेत. केवळ बहुजन वर्गाचं आराध्य दैवत म्हणून त्याचं नाव घेऊन राजकारण करायचं याचसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोटात एक आणि ओठावर दुसरं याप्रमाणें प्रत्येक राजकारण्यांनी वेळोवेळी गरळ ओकली आहे. ज्यांनी ज्यांनी शिवरायांची तसेच इतर बहुजन  महापुरुषांची बदनामी केली, त्यांचा उद्देश महापुरुषांची बदनामी करणे कधीच नसतो, तर  त्या महापुरुषांना आदर्श मानून वर्तमानकाळात ज्या चळवळी, संघटना, व्यक्ती प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढतात त्यांना दडपून टाकणे, त्यांचे मनोबल खच्चीकरण करणे हा उद्देश असतो.  

शिवाजीला क्षत्रियत्वाची आम्ही तात्पुरती सवलत दिली होती . तुम्ही खुशाल स्वतला उच्चवर्णीय समजा,पण तुम्ही शुद्रच आहात, वैदिक मंत्राने संस्कार झाल्याने ब्राह्मण आणि मराठे एका स्तरावर येणार नाहीत.  22,23 ऑक्टोबर 1901 केसरीत - वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांना उद्देशू टिळक म्हणाले होते. तर वि.दा.सावरकर म्हणतात, काकतालीय योगाप्रमाणे ( म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला ) शिवाजी राजा झाला. नाहीतरी त्याची योग्यता नव्हती. नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव व मदिरा आणि मदिराक्षी यांच्या विषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती.  

इतकच काय जवाहरलाल  नेहरू आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त म्हणतात.   छत्रपतीनी मध्ययुगीन भारतात राजेशाहीत लोकशाही नांदवली होती, मात्र जवाहरलाल यांनी आधुनिक भारतात लोकशाहीत ब्राह्मणशाही निर्माण केली, ज्याचे परिणाम आज बहुजन वर्गाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना काय कर्तृत्व कळणार आमच्या राजाचं. बहुतेक नेहरूंना त्यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या हजारो वर्षांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर, ब्राह्मणवादी व्यवस्थेवर शिवरायांनी जे वार केले होते ते सलत असावेत.  

जून 2003 ला अमेरिकन लेखक जेम्स लेन लिखीत हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन छत्रपती शिवाजी, माँ जिजाऊ यांची बदनामी केली. 1 सप्टेंबर 2003 या दिवशी जनता बँक व्याख्यानमाला, सोलापूर येथे बळवंत पुरंदरे जेम्सलेनच्या या पुस्तकाचे तोंडभरून कौतुक करतो.याच बळवंत पुरंदरेने राजा शिवछत्रपती पुस्तक लिहून त्यात शिवचारित्राच्या नावाखाली मराठा समाज आणि मराठा स्त्रियांची बदनामी केल्याबद्दल कोल्हापूर मध्ये एक कोटीचा दावा आणि पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात केस दाखल करण्यात आली होती.जेम्स लेनला मदत करणार मूळ केंद्रस्थान ही पुण्यातील  भांडारकर संस्था आहे हे समजल्यावर संभाजी ब्रिगेडच्या 72 मावळ्यांनी भांडारकर फोडलं.  

तेव्हा पुरोगामी राष्ट्रवादीच्या  आर. आर. पाटलांनी काय केलं ? तर या बळवंत पुरंदरेला आणि पुण्यातील भांडारकरमधील जेम्स लेनचे ब्राह्मण साथीदार यांना संरक्षण पुरवले आणि त्या 72 मावळ्यांवर कारवाई केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पुरंदरेला संरक्षण दिले तर त्याच पुरंदरेला भाजपा-सेनेने महाराष्ट्रभूषण आणि पदमविभूषण दिला. शिवरायांची बदनामी करण्यात दोन्हींची चढाओढ आपल्याला पाहायला मिळते.  ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकांत भाजपाने चला छत्रपतीचा आशीर्वाद, देऊ मोदीला साथ, अस म्हणत शिवरायांच्या नावावर सत्ता मिळवली , अगदी त्याचप्रमाणे 2004 ला काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवरायांच्या बदनामीचे भांडवल करून सत्ता हस्तगत केली होती.  

16 जानेवारी, 2004 मुंबई येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात हे अटलबिहारी म्हणाले की, जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी चुकीची आहे, हे ऐकून सुध्दा तेथे उपस्थित बाळासाहेब ठाकरे शांतच होते. पण संभाजी ब्रिगेडचे मावळे शांत बसले नाही त्यांनी 20 मार्च 2004 , बीड मधील वाजपेयीची सभा उधळली.  

इतकच नव्हे तर 16 मार्च, 2004 रोजी लालकृष्ण आडवाणीने जेम्स लेनच्या पुस्तकाचे समर्थन केले, त्याच दिवशी छावा संघटनेतील छाव्यानी उमरग्यात (उस्मानाबाद) आडवाणीचे धोतर पिवळे केले, शेवटी आडवाणीला माफी मागावी लागली.  

महाराष्ट्राच्या तत्कालिन मुख्यमंत्र्यानी तर कहरच केला. शिवरायांच्या मृत्यूदिनी रायगडावर ढोल ताशा नगारे वाजवले. शिवरायांची बदनामी करण्राया  बळवंत पुरंदरेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहिर केले. इतकेच काय गडकिल्ले भाड्याने देण्याचेही फडणवीस सरकारने जाहिर केले.  

बळवंत पुरंदरेच्या केसाला जरी धक्का बसला तर अख्या महाराष्ट्रात तांडव करीन. म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील शिवप्रेमींना आव्हान दिले इतकेच काय तर  श्रीकांत बहुलकरचीही माफी मागीतली. जेम्स लेनचा दुसरा एक सहलेखक श्रीकांत बहुलकर याला तत्कालीन मराठा महासंघ आणि पुण्यातील संवेदनशील शिवसैनिकांनी काळे फासले. तेंव्हा त्या श्रीकांत बहुलकरची राज ठाकरेंनी माफी मागितली होती  आणि आज पुन्हा पुरंदरेची वाहवा करीत म्हणतात त्यांनी शिवराय घराघरात पोहोचवला. ज्यांचा जन्म देखील झाला नव्हता त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोप्रयात शिवजयंती सुरु करून पोवाडा लिहून शिवरायांची महती सांगितली त्या जोतिराव फुलेंची महानता नाकारून आपली भटशाही किती श्रेष्ठ आहे हेच प्रत्येक राजकारणी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.  ज्यावेळेस इथल्या बहुजन वर्गाला भटशाहीने लिखाण-वाचनाची बंदी केली होती त्यावेळेस आपल्याला हवा तसा इतिहास लिहिण्याचे कसब इथल्या भटशाहीने केले. आणि ते बहुजनांच्या माथी देखील मारले. मात्र सत्य हे सत्य असते ते कधी तरी बाहेर येतेच आणि ते आज सर्वांना कळलेच आहे. 

तरीही भटशाही आपला हेका सोडत नाही. म्हणजे गिरे तो भी टांग उपर हीच मानसिकता. आरएसएस, काँग्रेस, हिंदू महासभा, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे एकूणच डाव्या, उजव्या, हिंदुत्ववादी, धर्मनिरपेक्षवादी म्हणून वावरणारे, सत्ताधारी आणि विरोधी म्हणवले जाणारे सर्वच राजकारणी इथल्या बहुजन वर्गाच्या महापुरुषांच्या बदनामीबाबत आतून एकच आहेत. या सर्वांनीच बहुजनांच्या महापुरुषांचा वापर केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी, आपली भटशाही टिकून ठेवण्याकरिताच केलेला आहे. हे आज आपण प्रत्यक्ष पहात आहोत. मात्र आता इथून पुढं तरी बहुजन वर्गाने यांचा कावा ओळखून आपला आणि आपल्या महापुरुषांचा वापर करू द्यायचा की नाही हे ठरवलं पाहिजे. ते  आपल्या हातात आहे. यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल, शत्रू आणि मित्राची ओळख करून घ्यावी लागेल, जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवावा लागेल. तरच येणाऱया काळात आपल्या महापुरुषांची बदनामी थांबेल, नाहीतर वेळेनुसार नवनव्या क्लुप्त्या शोधून भटशाही आक्रमण करीतच राहिल 

याबाबत जितेंद्र आव्हाडांनी मात्र नेमक्याच शब्दात आपले मत नोंदवले आहे, ते म्हणतात,  बाबासाहेब पुरंदरेंशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचा जेम्स लेन यांनी दावा केल्यानंतर २० वर्ष हा कुंभकर्ण झोपला होता का?  एक तर २००३ साली हा वाद सुरु झाला होता.  ते वाक्य पुस्तकातून काढत का नाही,  आधीआरोप करायचा, मग दुसऱ्या दिवशी पत्रक काढायचे, हे कोण मॅनेज करत आहे, जेम्स लेनची सुरुवात कोणी केली सर्वांना माहिती आहे, पण नाव घ्यायचे नाही,  २० वर्षांनी त्यांना जेम्स लेन सापडला.  २००३ ला पुस्तक आले, तेव्हा जेम्स लेन नाही सापडला. जेव्हा महाराष्ट्र भूषण झाला तेव्हा वाद झाला, महाराष्ट्रात शोधपत्रकारिता करत असलेल्या काही मोठ्या पत्रकारांना आता जेम्स लेन सापडला. म्हणजे महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करण्याचा हा किती मोठा कट आहे, याचे उत्तम उदाहरण आहे. ज्या पत्रकाराने मुलाखत घेतली त्यांनी कोणत्या आधारे लिहिले हे विचारावे आणि हे काढत का नाही विचारावे. जे घाणेरडे लिहिले आहे ते काढू टाका असे सांगा,  पुरंदरे यांनीच स्वत: लिहिले असल्यामुळे हा संबंध येतो,  २० वर्षांनी पत्रकार शोधतात, मग तो सापडतो, मुलाखत घेतो. आम्ही काय वेडे म्हणून जन्माला आलो आहोत का? याआधी जेम्स लेनला मातीत गाडले होते का?  

---- सुबोध शाक्यरत्न


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com