ठाणे महानगर पालिकेतील शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, स्थावर मालमत्ता, तत्कालीन अग्निशमन अधिकारी यांची चुकीच्या पध्दतीने केलेली निवड आणि एकूणच या विभागांच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षेतेखालील समितीद्वारे या सर्व प्रकरणांची चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. घाडीगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवल्यानंतर तात्काळ ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून या सर्व आरोपांशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा असणारे पत्र पाठवले आहे.त्यांचे हे पाच पानी पत्र सध्या सोशल मिडियावर वायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात जयस्वाल यांच्याकडे खुलासा मागविण्यात आला नसतानाही तो त्यांनी का दिला आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल का करण्यात आला असा सवाल ठाणेकर विचारत आहेत.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात तब्बल १०२ हून अधिक प्रकरणात अनिमितता झाली असल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला आहे. त्यांच्या महापालिकेतील वाढीव कार्यकाळाबाबतही आक्षेप घेत, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या असलेल्या सलोखाच्या संबधांमुळेच त्यांचा कार्यकाळ आणि शहरातील अनेक कामात अनियमितता झाली असल्याचा आरोपही केला आहे. तसेच त्यांच्या आयुक्त बंगल्यात देखील एका अल्पवयीन मुलीबाबत झालेल्या प्रकार बाबतही त्यांनी या पत्रात उल्लेख केला आहे.
यावर खुलासा करताना जयस्वाल यांनी घाडीगावकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याने आणि त्यांना पुढील ६ वर्षे निवडणुक लढविता येणार नसल्याने, तसेच माझ्या कार्यकाळात हफ्तेखोरीला लगाम लावल्यानेच त्याचा राग मनात धरूनच घाडीगावकर यांनी तक्रार केल्याचे म्हटले आहे. संजय घाडीगावकर ब्लॅकमेलर असल्याचा उल्लेख करत ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत, त्या चुकीच्या आणि बोगस असल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पत्रामुळे आपल्याला धक्का बसला असल्याने आपण हा खुलासा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याने घाडीगावकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. तसेच त्यांनी पुढील सहा वर्षे निवडणुक लढविता येणार नसल्यानेच याचा राग मनात धरुन त्यांनी ही तक्रार केल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे. किंबहुना तेव्हापासून ते माझ्याविरोधात खोटय़ा तक्रारी करुन माझी पत्रिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात, त्यांनी आत्महत्येसाठी काही नगरसेवक आणि राजकारण्यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार धरले होते. त्यानंतर पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना ठाण्यातून (चार) नगरसेवक विक्रांत चव्हाण (आयएनसी), सुधाकर चव्हाण (मनसे), हणमंत जगदाळे (राष्ट्रवादी) आणि नजीब मुल्ला (राष्ट्रवादी) यांना अटक करण्यात आली आणि बराच काळ तुरूंगात आहेत. हे सर्व नगरसेवक ठाण्यातील कुख्यात गोल्डन गँगचे सहकारी होते. त्यांच्या व्यतिरिक्त संजय घाडीगावकर व अन्य काही नगरसेवकही गोल्डन गँगचे सदस्य असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. या टोळीच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेत ब्लॅकमेलिंग व खंडणीखोरीचे एक युग सुरू झाले होते. परंतु पोलिसांच्या मदतीने मी या गोल्डन गँगचे वर्चस्व मोडीत काढण्यात यशस्वी झालो होतो, त्यानंतर अटक केलेले नगरसेवक जामिनावर तुरुंगाच्या बाहेर होते परंतु त्यांचा खटला अजूनही सुरू आहे.
तसेच महापालिकेतील खोटय़ा तक्रारी करणाऱ्यांचे रॅकेटही मी उघडकीस आणले होते. शिवाय प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालात देखील आरटीआय कार्यकर्ता ब्लॅकमेलर म्हणून घाडीगावकर यांचे आहे. विशेष म्हणजे तेव्हा एका आरटीआय कार्यकर्त्याला अटक देखील झाली होती. तसेच बोगस व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून माझी बदनामी देखील करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु या प्रकरणातील गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. याशिवाय लेडीज बार, लॉजमध्ये जेथे बेकायदेशीर व्यवसाय चालतात त्यांच्यावर देखील मी कारवाई केली होती. या बारच्या मालकाने माझ्याविरुध्द हा खोटा व्हिडिओ बनविला होता. जो पोलीस अन्वेषण आणि आरोपित पीडितेच्या नकार व्हिडिओद्वारे सिद्ध झाला होता. तसेच माझ्याविरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने आरोप फेटाळून लावले. १०० हेक्टरी जमीनवर बेकायदा बांधकामे करण्यात आल्याने ती देखील हटविण्यात आली होती. तसेच माझ्या कार्यकाळात बेकायदा बांधकामे देखील पाडली गेली होती. त्यामुळे अशा ब्लॅकमेलरचे हप्ते देखील बंद झाले होते. त्यामुळे माझ्या जीवाला धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळेच मी पोलीस संरक्षण घेतले होते. आजही मला जीवाला धोका असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
0 टिप्पण्या