Top Post Ad

वादळाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच राज्यात ?

 

  मुंबई ठाण्यासह पालघऱ आणि इतर जि्ह्यात  पहाटे चारपासून वादळी वारे वाहू लागले. सोबतच जोरदार कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांना अक्षरश: धडकी भरली.  सकाळी १० वाजल्यानंतरही पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा वेग कायम होता. दुपारी तीनपर्यंत निसर्गाचा हा रौद्रावतार कायम होता. या तौक्ते वादळाने  रायगड जिल्ह्यात चार, रत्नागिरी, ठाणे प्रत्येकी दोन, सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक मीरा रोड येथे १ अशा एकूण ११ जणांचा बळी घेतला. तसेच ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा येथे सहा घरांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे.  वादळाबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच राज्यात येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती आधीच अडचणीची आहे. कोकणातील वादळग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची भूमिका राज्य शासनाला घ्यावी लागणार आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला मदतीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडून केंद्राकडे केली जाण्याची शक्यता आहे.

 ठाणे जिल्ह्य़ातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे अनेकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. अशा घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले. दिवसभर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस सुरू होता. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी खंडीत झालेला वीज पुरवठा रात्री उशीरापर्यंत सुरळीत झाला नव्हता.  जिल्हाप्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ६ सहावाजेपर्यंत जिल्ह्य़ात सरासरी ११.५ मीमी इतका पाऊस पडला. तसेच सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे ३९१ वृक्ष उन्मळून पडले. तर, २९५ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोसळल्या. या घटनांमध्ये १७२ ठिकाणी घरांचे तसेच बांधकामांचे नुकसान झाले. उल्हासनगरमध्ये रिक्षावर झाड कोसळून एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तर, सायंकाळी नौपाडा येथे कारवर झाड कोसळले. यात कारमधील डॉ. रितेश गायकवाड हे जखमी झाले. शिळफाटा येथेही होर्डिंग टेम्पोवर कोसळून दोनजण जखमी झाले.

दिवा शहरातही रस्त्यावर पाणी साचले होते, तर भिवंडीमध्येही वृक्ष उन्मळून पडले होते. शिळफाटा मार्गावर देसाई नाका परिसरात एक मोठे होर्डिंग टेम्पोवर कोसळले. या घटनेत सचिन चव्हाण (३५) आणि छबन चौधरी (४५) हे दोघे जखमी झाले.  त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक सहावर उन्नत विजेच्या तारेवर झाड कोसळले. त्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर झाला. कल्याण, डोंबिवली शहरांच्या बाहेर खाडीकिनारा परिसरांत असलेल्या मोकळ्या जागेतील काही इमारतींवरील पत्र्यांचे निवारे वादळी वाऱ्याने उडून गेल्याचे दृश्य पाहण्यास मिळत आहे. अंबरनाथ शहरात गेल्या दोन दिवसांत ४२ झाडे उन्मळून पडली . कानसई, खेर सेक्शन, वडवली, बी केबिन रस्ता, हुतात्मा चौक, स्वामी समर्थ चौक, शिवगंगा नगर, लक्ष्मी नगर या भागात मोठी पडझड पाहायला मिळाली. बदलापूर शहरातही पूर्व आणि पश्चिम भागांत सात झाडे पडली होती. पडलेली झाडे हटवण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता दोन्ही शहरांचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी व्यक्त केली.

पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात १२५ प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बोईसर मंडल क्षेत्रात नऊ तासांत ११४, तर तारापूरला १२० मि.मी. पावसाची नोंद झाली. संध्याकाळीही पाऊस सुरूच होता. वादळी वारा व पावसामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले होते. सकाळपासून वीज नसल्याने इमारतींमध्ये राहणाऱयांचे पाण्याविना हाल सुरू होते. शेकडो घरांचे पत्रे उडून गेले. कोकणात रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले.

 सखल भागात पाणी साचल्याने आणि मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक मंदावली. रेल्वे ट्रँकवरदेखील झाडे पडल्याच्या घटना घडल्याने लोकल वाहतुकही काही काळ खंडित झाली आणि धावत्या मुंबईला ब्रेक लागला. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरील विमानसेवा सोमवारी बंद ठेवण्यात आली. चेन्नईहून निघालेले विमान सकाळी ८.१५ वाजता सुरतच्या दिशेने तर लखनौवरून मुंबईला येणारे विमान अर्ध्या वाटेतून परत पाठविण्यात आले. जवळपास २०० विमान फेऱ्यांना वादळाचा फटका बसला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com