राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला. यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहिम पुर्ववत व्हावी यासाठी केंद्र सरकारने मुंबईतील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हाफकिन संस्थेला भेट देत तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यासोबतच त्यांनी हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केंद्राकडे केली. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही केंद्र सरकारला पत्र लिहित ही मागणी केली होती. यानंतर नुकतीच केंद्राकडून ही परवानगी मिळाली आहे. हाफकिनमध्ये आवश्यक ती व्यवस्था आणि साधनसामग्री उभारण्यात आल्यानंतर तिथे लस निर्मिती शक्य होऊ शकणार आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सकाळीच एक ट्विट केले. या एका ट्वीटनंतर हे दावे सुरू झाले आहेत. त्यांच्या ट्वीटवर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही उत्तर दिले आहे. हा बालिशपणा असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, 'राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात "ठाकरे ब्रँड".करोना काळात "राजकारण" नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती.' यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. संदीप देशपांडे असे म्हणाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना उत्तर दिले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत पत्रव्यवहार करत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रव्यवहार केला आणि हे सर्व महाराष्ट्रासाठी व मुंबईसाठी चांगलेच झाले. मात्र राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असे म्हणणे बालिश होईल.
0 टिप्पण्या