ग्लोबल रुग्णालयाची क्षमता १३०० रुग्णांची आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी १०२४ रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. या रुग्णांवर उपचारांसाठी २४ तासांत ३५० डॉक्टरांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात १५० डॉक्टरांच्या बळावर उपचार केले जात आहेत, ही संतापजनक बाब आहे. या रुग्णालयात डॉक्टरांबरोबर नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला महापालिकेने पाठिशी न घालता फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.
ग्लोबल कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटरमध्ये २४ तासांसाठी ३५० डॉक्टरांची गरज असताना अवघ्या १५० डॉक्टरांच्या साह्याने तपासणी केली जात असल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. डॉक्टर, नर्स यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पुरविण्यास सदर कंत्राटदार अपयशी ठरला असल्याची बाब निदर्शनास आली आहे. कोरोनाच्या पहिल्या आपत्तीच्या वेळी दहा वेळा जाहिरात देऊनही महापालिकेला डॉक्टर, नर्ससह वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे महापालिकेने मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट दिले. त्यासाठी प्रती बेडमागे ५०० रुपये ते १५०० रुपये कंत्राटदाराला अदा केले जात आहेत. मात्र, सद्यस्थितीत कोविड रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्याने महापालिकेची फसवणूक करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे
ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील बॉडीबॅग संपल्याचा प्रकारही नुकताच उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासकिय कार्यालयात जाऊन नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी माहिती घेतली. त्यावेळी अपुऱ्या डॉक्टरांवर कारभार सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या दोन्ही नगरसेवकांनी व्होल्टास, बुश, पार्किंग प्लाझा रुग्णालयात जाऊन पाहणी केली. व्होल्टास, बुश कंपनीत केवळ हॉस्पिटलचे सांगाडे आहेत. त्याचा सामान्यांना काही उपयोग नाही. आता आपत्तीच्या काळात दोन्ही हॉस्पिटले रिकामी असल्यामुळे केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हॉस्पिटले उभारली होती का, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी केला. अशीच परिस्थिती पार्किंग प्लाझा रुग्णालयाची आहे. अपुरे कर्मचारी आणि ऑक्सिजनअभावी पूर्ण क्षमतेने हॉस्पिटल सुरू करण्यात आलेले नाही. तर व्होल्टास, भूमिपूत्र, कौसा, बुश कंपनी, बोरिवडे येथील हॉस्पिटल बंद आहेत. संबंधित कंत्राटदार हा आवश्यक डॉक्टर, नर्ससह वैद्यकीय कर्मचारी पुरविण्यास अपयशी ठरलेला आहे. किंबहूना त्या कंत्राटदाराची क्षमता नसल्यामुळेच तो कर्मचारी पुरवू शकत नाही. मात्र, त्याने आपल्याकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध असल्याचा आभास निर्माण करून कंत्राट मिळविले. त्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही खातरजमा केलेली नाही. त्याचे परिणाम आज ठाणेकरांना भोगावे लागत आहेत
0 टिप्पण्या