ठाणे
कोणतीही आस्थापना किंवा व्यवसाय बंद करणे ही महापालिका प्रशासनाची भूमिका नाही पण केंद्र आणि राज्य सरकारच्या को-वी-ड १९ नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासन जोपर्यंत कोविड १९ महामारी संपल्याचे जाहिर करीत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून सर्व आस्थापनाधारकांनी महापालिकेस सहकार्य करून आस्थापना सील करण्याची वेळ येवू देवू नका असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे.
आज दुपारी को-रो-नाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॅाटेल असोसिएशन, थिएटर असोसिएशन, मॅाल्सधारक, मंगल कार्यालय असोसिएशन आणि इतर आस्थापनांचे पदाधिकारी यांच्यासमवेत महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्बंधांविषयी सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. यामध्ये सिनेमागृहे, हॅाटेल्स-रेस्टॅारंटसमध्ये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवतानाच मास्क वापरणे, प्रत्येकाचे तापमान तपासणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे आदी निर्बंध पाळणे बंधनकारक आहे. मॅालमध्येही मास्क वापरणे, प्रत्येकाचे तापमान तपासणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे आदी निर्बंध पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसून लग्न समारंभासाठी केवळ ५० लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे तर अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांनाच परवानगी देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या निर्बंधाबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली गृहविलगीकरण करणे, १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याबाबतचा माहिती फलक संबंधित घरावर लावणे, को-वि-ड पॅाझिटीव्ह रूग्णांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणे आदी सूचनाही या मार्गदर्शक सूचनांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विविध आस्थापनांकडून या निर्बंधाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून को-वी-ड १९ ची महामारी संपल्याचे जाहिर होत नाही तोपर्यंत संबंधित शॅापिंग मॅाल्स, आस्थापना, मंगल कार्यालये, हॅाटेल्स बंद करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान . ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) व ( ३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इ. कार्यकमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरू आहेत दि. २८ मार्च २०२१ रोजी होळी व दि. २९ मार्च २०२१ रोजी धुळीवंदन/शब्बे बारात असे सण उत्सव संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. सदर मनाई आदेश दि. १६ मार्च २०२१ रोजी ००.०१ वाजेपासून दि. ३० मार्च २०२१ रोजी २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.
जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे. लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका, सरकारी/ निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका, सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण. यामधून वगळण्यात आले आहे.
0 टिप्पण्या