ठाण्यातील विविध ठिकाणी शिधावाटप दुकानात दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या लोकांना मिळणारे तांदूळ आणि गहू हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे मिळत असल्याबाबतची लेखी तक्रार नगरसेविका नंदा पाटील यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती. ठाण्यातील ३६ फ दुकान नंबर १५४ गोकुळनगर, ३६ फ / २१९ शीतल डेअरी, ३६ फ / ३९ खोपट, ३६ फ / १२९, ३६ फ / ४५ मसानपाडा कॅशलमिल, ३६ फ / १३३ कोलबाड आदी विविध ठिकाणावरील शिधावाटप दुकानात अति निकृष्ठ दर्जाचे तांदूळ आणि गहू मिळत असल्याबाबत तक्रार होती. केळकर यांनी तात्काळ याबाबत शिधावाटप अधिकारी पळसकर यांना या दुकानातील तांदूळ आणि गहू यांचे नमुने तपासण्याच्या सूचना दिल्या असता तांदूळ-गहू अत्यंत निकृष्ठ दर्जाचे दिसून आले. केळकर यांनी या विषयी शिधावाटप अधिकाऱ्यांना असे निकृष्ठ दर्जाचे तांदूळ-गहू नागरिकांना न देण्याच्या सूचना करून नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य देण्यात यावे असे सांगून याबाबत संताप व्यक्त केला. त्याप्रमाणे ३६ फ चे शिधावाटप अधिकारी यांनी संबंधित तसेच इतर ठिकाणी असलेल्या शिधावाटप दुकानदारांना तात्काळ असे तांदूळ आणि गहू न देण्याच्या सूचना केल्या असून असे धान्य बदलण्याचे निर्देशही अधिका-यांनी दिले असल्याची माहिती केळकर यांनी बोलताना दिली.
0 टिप्पण्या