अहिल्याबाईंची ओळख त्या काळात केवळ देशात नव्हती, तर जगभरात होती. त्यांची तुलना रशियाची राणी, ब्रिटेनच्या राणीशी करण्यात आली. जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई होत्या. इंग्लिश लेखकाने त्यांचं हे मोठेपण अधोरेखित केलं. अहिल्याबाईनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय दिला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं. त्यांनी हातातील सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला. २० वर्षांपूर्वी उमाजी नाईक पुतळ्याचं उद्घाटन आपण केलं. आज अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं उदघाटन ही सन्मानाची बाब असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते जेजरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर बोलत होते. यावेळी धनगर समाजातील अनेक नेते उपस्थित होते
महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी लावला. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकर कुटुंबात विवाह लावला. आज मात्र समाजात जातीय विषमता निर्माण झालीय. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचे नमूद करत ते पुढे म्हणाले की, एका ऐतिहासिक कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलोय. अहिल्यादेवींनी इतिहास घडवून स्त्री शक्तीचं महत्व समाजाला दाखवलं. त्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेने येथे येतात. या प्रांगणात येणा-या प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल.
जामखेड तालुक्यातील चोंडीला अहिल्याबाई यांचा जन्म झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे यांनी मुलींना शिकवण्याचं काम केलं. मल्हारराव होळकर एकदा चोंडीला थांबले. त्यांनी चुणचुणीत मुलगी बागडताना पाहिली. त्यांनी आपले चिरंजीव खंडेराव यांच्यासाठी तिची निवड केली आणि सून म्हणून आणलं. दुर्दैवाने खंडेराव यांना लढाईत मृत्यू आला. मल्हारराव होळकर यांनी सती जायची पद्धत असताना सती न जाण्याचा आग्रह धरला. अहिल्याबाई यांनी प्रांताची जबाबदारी घेतली. इंग्रजी राजवटीशी संघर्ष केला. पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढल्यानंतर त्यांनी त्यांना खडसावलं. महेश्वर, इंदौर ही शहरे त्यांनी उत्तम बनवण्याचा प्रयत्न केल्याचे पवार म्हणाले. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही. आपल्याला समाज उभा करायचाय. स्त्री आणि पुरुष एकत्र करुन अहिल्याबाईचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
0 टिप्पण्या